बुधवार, २३ जुलै, २०१४

२. खजिना : भाग तीन

                                        एके दिवशी मी घरातल्या सगळ्यांसाठी पेप्सीकांडी घेऊन आलो. अण्णांना सुद्धा आम्ही एक लेमनपेप्सी दिलेली. ते पेप्सी खात असताना मी लपूनच त्यांना पाहत होतो. पेप्सी मस्तपैकी खाउन झाल्यावर अण्णांनी पेप्सीचा प्लाष्टिक कागद हातातच धरून ठेवला आणि ते त्यावरची इंग्रजी अक्षरं वाचू लागले. अण्णा!

                                       अण्णांना काहीतरी वाचताना मी पहिल्यांदाच पाहत होतो. पटकन मला एक युक्ती सुचली. गावाला येताना मी ठकठक, चांदोबा, चंपक असली चार-पाच गोष्टींची पुस्तकं वाचायला म्हणून आणली होती नि पहिल्या दोन दिवसांतच वाचून संपवलेली सुद्धा. त्या दिवशी संध्याकाळी अण्णा पडवीतल्या त्यांच्या खुर्चीत चहा पीत बसले असताना मी गुपचूप ती पुस्तकं त्यांच्या कॉटवर उशीशेजारी ठेऊन दिली. थोड्याच वेळाने अण्णा येउन कॉटवर बसले. त्यावेळी मी काजूच्या बिया मोजण्याचं काम लक्ष देऊन करत होतो. म्हणजे हाताने बिया मोजत होतो, पण लक्ष मात्र अण्णांवर ठेऊन. अण्णांनी पुस्तकांकडे एकदाच सरळ पाहिलं आणि पुन्हा ते नेहमीच्याप्रमाणे त्यांचा भिंतीकडे टक लावून बघण्याचा कार्यक्रम करू लागले. फुस्स्स!
माझा प्लॅन साफ फसला. बिया मोजण्याच्या तश्श्शाच ठेऊन मी रागाने स्वयंपाकघरात, चुलीजवळ जाउन बसलो. मला भूक लागलीये असं वाटून नानीने मला बुद्धूसारखं जेवायलाच वाढलं. शिवाय आणि मी डब्बल बुद्धू रागारागाने जेवलोसुद्धा!
                                       मोरीत हात धुवून मी जेव्हा वरती माझघरात जायला लागलो तेव्हा दारातूनच मी पाहिलं. अण्णांच्या हातात चांदोबा होतं!! ते मस्तपैकी झोपून-बिपून ऐटीत पुस्तक वाचत होते.

लाडातच!

                                      अण्णांचं बरोबरच होतं. विरारला आमच्या चाळीच्या पुढे जी कौलारू आडवी चाळ आहे की नाही, त्यातल्या शेवटच्या घरापुढल्या जागेवर कोपरयात तीन-चार बालवाडी, पहिलीतली पोरं-पोरी मिळून 'घरपणी' खेळत असतात. मस्तपैकी लाकडी पाट वगैरे  लावून, जत्रेतली खेळण्यातली भांडीकुंडी ठेऊन ते खेळतात. त्यांच्या खेळामध्ये शेतावर जाणारे बाबा असतात, जेवण बनवणारी आई असते, त्यांची दोन मुलं असतात. रात्रीचं जेवण केल्यानंतर ते लोक बुद्धुसारखे तिथेच रांगेत झोपतात सुद्धा! लाडातच.
                                     त्यांच्या बाजूला बसून त्यांचा खेळ बघत बसायला मला फार आवडतं. एकदा आईने दिलेल्या एक रुपायाचे चणे घेतल्यावर मी त्यातले अर्धे त्यांना खायला दिले तर त्या बुटक्या लोकांनी एकेका चण्याचे छोटू-छोटूशे तुकडे करून डाळभातासारखे खाल्ले!

                                       पोरं म्हणजे पण ना बोरंच आहेत ती. पण पिकलेली. गोड गोड. त्यांचा खेळ पाहून मलाही त्यांच्यासोबत फार खेळावंसं वाटतं. घरातून लाकडी पाट आणावा आणि त्यावर रंगीबेरंगी खडे, काडेपेटी, झाडांची फळं, पानं-फुलं तोडून आणून छानपैकी दुकान थाटावं आणि त्यांच्या खेळातला दुकानदार दादा व्हावं. ऐटीत दुकान चालवावं. पण हे होणार थोडीच!त्यांच्यासोबत असलं काय खेळताना कुणी मला बघितलं की संपलंच.
                                      'आयलट- बायलट पोराची पोरगी, आपला आक्शय झालाय पोरगी' असं अख्खी वाडी चिडवायला लागणार. पुन्हा काही खेळायला गेलं की खेळात आपल्यालाच बकरा करणार. आपल्यावरचं राज्य मग अंधार पडेपर्यंत जायचं नाव नाही. अण्णांनासुद्धा त्या पुस्तकातल्या गोष्टी आपण वाचाव्यात असं मनापासून वाटत असणार पण ती छोट्या मुलांच्या गोष्टीची पुस्तकं वाचताना आपल्याला कुणी पाहिलं तर चिडवतील, असली भीती त्यांना वाटत असणार. नक्कीच.

                                      अजुनी मला चुलीजवळ बसलेलं पाहून नंदिआत्यानं आरडाओरडच सुरु केली.तिच्या आवाजाने कंटाळून टोपलीपाठची मनीसुद्धा बाहेर येउन तिची ऐटदार शेपटी उडवत आळस देत- देत परसात निघून गेली. मला पण मनीसारखं आळस देत परसात जायचं होतं पण तसं करणं आता फारच धोक्याचं होतं. मला भरपूर रागावल्यावर नांदी आत्या पाय आपटत माळ्यावर निघून गेली. नानीनं माझ्यासाठी तपेल्यातलं गरम पाणी बादलीत ओतून दिलं. मग मी माझा टॉंवेल घेण्यासाठी माजघरात गेलो तर नाना, आज्जी, नंदिआत्या यांची फौज एकत्र होऊन माझ्यावर जोरजोरात रागावू लागली. त्याचं चक्रव्युह तोडून मी कसा-बसा पुन्हा मोरीत आलो तर आज्जी मराठ्यांसारखा पाठलाग करत माझ्यामागून मोरीपर्यंत आली! शेवटी तिने पुन्हा एकदा फिरून सगळ्यांवर रागावून झाल्यानंतर मी अंघोळीला सुरुवात केली.

                                      सर्व तयारी झाली होती. मी, नंदीआत्या नवीन कपडे घालून बसलो होतो. गाडी येण्याची वेळ झाल्यावर मी देवघरातल्या देवांच्या पाया पडलो. घरातल्याही सगळ्यांच्या पाया पडलो आज्जीच्या पाया पडायला गेलो तर ती रडायलाच लागली नानीच्या पाया पडायला गेल्यावर तिने मला जवळ ओढून घेतलं. तिच्या साडीच्या पदराला जो मस्तपैकी छान आणि ओळखीचा असा वास येत असतो तो कुठल्या तरी डबीत भरून घेऊन आपण सोबत नेला पाहिजे, असंच वाटलं मला.

"मस्ती करू नको. शाळेत नीट जात जा. आईला त्रास देऊ नको आणि गणपतीच्या सुट्टीत लवकSSS र परत ये SSS ऐकलंस?" नानी म्हणाली.
"होSSS , पण तू  मनिला दुध आणि खाऊ देत जा." मी सुद्धा नानीला एक महत्वाची सूचना देऊन टाकली.

"पण आहे कुठं तुझी मनी?"

                                      आम्ही मनिला हाका मारून पाहिल्या. ती कुठेच दिसत नव्हती. तेवढ्यात खिडकीतून आम्ही पाहिलं की, नाना आमची कपड्यांची बॅग घेऊन दुकानाकडे जात होता आणि त्याच्यामागून जणू काही ती स्वतः चीच बॅग असल्याच्या तोऱ्यात मनी कुणाकडेच न पाहता अगदी ऐटीत शेपटी उडवत चालली होती.

लाडातच!!






                                                                                                    उर्वरित गोष्ट पुढील भागात …


   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा