गुरुवार, २९ मे, २०१४

१. सोनेरी लाटांची गोष्ट : भाग तीन

                                      सोनेरी लाटांची गोष्ट प्रांजलीकडून ऐकल्यापासून मला काय चैनच पडत नव्हती. कधी एकदा त्या लाटा पाहायला मिळतायत असं झालेलं. पण आमची शाळा दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजून तीस मिनीटांपर्यंत. पळत पळत घरी यायचं म्हटलं तरी सहा वाजणारच. तोपर्यंत सूर्यबुवा त्या लांबच लांब दिसणाऱ्या झाडांच्या रेषेपाठी बुडायच्या अगदी तयारीतच असणार. मग त्या बाजारातल्या टोटाळे तलावावर जायचं तरी कधी आणि कुणासोबत? शनिवारी आमची सकाळची शाळा असते आणि रविवारी तर सुट्टीच, म्हणजे त्या दिवशी हे जमण्यासारखं असतं की नाही? पण ते जमायचं नावच नाही. कारण आई-पप्पा अगोदरच सुट्टीचं गुपित ठरवून ठेवणार आणि मला मात्र सांगणार नाहीत. शनिवारी दुपारी मी शाळेतून घरी आलो की जेऊन लगेच आई नवीन कपडे घालायला देणार. मग कितीही रडलं, आपटाआपट केली तरी फायदा नाही. उलट मारच पडणार. बाहेर पळून गेलं तरी आई आपल्याला शोधत खाली येणार. मग आपण जिकडे खेळत असणार तिथून घरापर्यंत आपली वरातच!
                                      नवीन कपडे घालून आईसोबत रिक्षात बसायचं. स्टेशनला उतरून पुन्हा त्या भंगार ट्रेनमध्ये बसायचं. दादर स्टेशन कधी येतं ते आपल्याला कळतच नाही. कारण तोपर्यंत आपण आईच्या मांडीवर मस्तपैकी झोपलेले. दादर स्टेशनवर आम्ही पोरं 'डोंगराला आग लागली पळा पळा' खेळताना जशी पळतो की नाही तश्शीच मोठी माणसं पळत असतात. अशावेळी मला मोठ्ठयाने ओरडून त्यांना स्टॅचू करावसं वाटतं. एक-दोन-तीन, स्टॅचू SSS! सगळी माणसं स्टॅचू होतील. आईसुद्धा. मग आपण लगेच ट्रेनमध्ये बसून पुन्हा विरारला जाऊ आणि तिथून जोरात ओरडू ओ-व्ह-र SSS. एक-दोन वेळा मी स्टॅचू म्हणालेलो सुद्धा, पण फ़ुस्स्स्स! कुणी थांबलंच नाही.

                                      दादरला गेल्यावर मोठमोठी काचेची दुकानं, डब्बलडेकर बसगाड्या, भारीभारीतल्या रंगीबेरंगी गाड्या रस्त्यावर दिसणार. तेव्हा मग सोनेरी लाटा आमच्या डोक्यातून पार उडूनच जाणार. वरळीला मामाकडे गेल्यार तिथले मित्र, नवनवीन खेळ, व्हिडीओ गेम, रंगीत टि.व्ही.वरचं कार्टून इतकंच नाही तर रात्री दादाबरोबर फिरायला सी फेस वर! सी फेस म्हणजे की नाही एक मोठ्ठाच्या मोठ्ठाला समुद्र. त्या समुद्राच्या किनारी लांबच्या लांब दगडी कट्टा आहे. त्या कट्ट्याजवळ खूप लोक रात्री फिरायला येत असतात. तिथे कुल्फीवाले, चणे-शेंगदाणेवाले, काकडीवाले, मकावाले हे तर असणारच. आपण मस्तपैकी कुल्फी घ्यायची आणि दगडी कट्ट्यावर जाउन बसायचं. पाठीमागे एकदम लांबच्या लांब गेलेला, पिवळ्या दिव्यांनी झगमगलेला रस्ता आणि पुढे आपल्यासमोर समुद्राच्या लाटा. सफेद सफेद फेसाच्या लाटा समुद्रात सारख्या येतच असतात. त्या कधी थांबतच का नाहीत कुणास ठाऊक? पण त्या लाटांचा खूप मस्त आवाज येतो. तो ऐकताना कुणीतरी कानाशी गुदगुल्याच करत असल्यासारखं वाटतं. फिरून पुन्हा घरी येउन आपण झोपलो तरी सुद्धा तो आवाज आपल्या कानाशी वाजत असतो.
                                      रविवारी रात्री उशिरा आपण विरार स्टेशनला उतरून, रिक्षात आई-पप्पांच्या मध्ये बसून घरी कधी येतो ते आपल्याला कळणारच नाही. आपण एकदम ढाराढूर ते पंढरपूरच! सकाळी उठलं की राहिलेला अभ्यास करून, जेऊन पुन्हा आम्ही आमच्या शाळेत. मग वर्गात प्रांजलीला पाहिलं की तिच्या डोळ्यात आपल्याला त्या सोनेरी लाटा दिसू लागणार. कारण प्रांजली कालच्या संध्याकाळी तिच्या आजुबाबांसोबत तलावाच्या त्या दगडी पायरयांवर बसून सोनेरी लाटा पाहून आली असणारच! मग काय? मधल्या सुट्टीत कालच्या सोनेरी लाटांची आणखीन एक नवीन गोष्ट!

                                     एके दिवशी शनिवारी दुपारी मी शाळेतून घरी आलो. हात-पाय-तोंड धुवून जेवायला बसलो, जेऊन सुद्धा झालं. तरी आईने,"आज आपल्याला मामाकडे किंवा आणखी कुणाकडे तरी जायचं आहे", असलं काही मला सांगितलंच नाही. त्यादिवशी मी खूप खेळलो. त्याच्या दुसरया दिवशी पप्पांसोबत बाजारातही जाउन आलो. आणि दुपारी जेऊन पुन्हा खेळायला पळालो.
                                     संध्याकाळी मात्र पप्पा मला घेऊन बाजारात निघाले. पाच-सव्वा पाच वाजले असतील. मला काय तेव्हा बाजारात जायचं नव्हतं. कारण दुपारपासून आमच्या लपाछुपीच्या खेळाला भरपूर मज्जाच येत होती. आम्ही दहा-बारा पोरं पोरी मिळून लपाछपी खेळत होतो. त्यात आज माझ्यावर राज्य येत नव्हतं त्यामुळे चांगलंच वाटत होतं. एवढे जण लपाछुपी खेळत असताना ज्या पोरावर राज्य येईल ते पोरगं रडणारच. कारण मग सगळे त्याला फसवणार. चिडाचिडी करणार. अंधार पडेपर्यंत काही त्या पोरावरचं राज्य जायचं नाव नाही. पुढे दोन-तीन दिवस तरी ते पोरगं लपाछुपी खेळायला येणार नाही. पण तोपर्यंत दुसरा कुणीतरी बकरा होणार. आजचा बकरा आमच्या चाळीपुढचा पिंट्या होता. आपलं राज्य घालवण्यासाठी तो धावतच सगळ्यांना शोधायचा आणि पटापट थप्पे करायचा. पण तरीसुद्धा शेवटी कुणीतरी भोज्ज्या करतच होतं. पिंट्या लवकरच रडकुंडीला येणार होता. मी आणि परशा एकत्रच इथं-तिथं लपत होतो आणि पाच-सहा थप्पे झाले की मुद्दामच बाहेर पळत येउन आउट होत होतो. येऊ दे कुणावर पण राज्य, आम्हाला काय? असेच आम्ही दोघं बैलगाडी पाठी लपलो होतो. अचानक माझ्या शर्टाची कॉलर जोरात खेचली गेली. मी आपोआप उभाच राहिलो. कुणीतरी मला खेचून उठवलं होतं. मी मान वळवून मागे पाहिलं तर मला आमच्या नंदिआत्याचा ड्रेस दिसला. वर पाहिलं तर नंदिआत्याच होती ती. मोठमोठ्यानं काहीतरी बोलत होती. मला काय ते ऐकायचंच नव्हतं. मी तिच्या हातातून निसटून जायला पाहत होतो पण शेवटी ती मला खेचत-खेचत घराकडे निघाली. मी आत्याच्या पाठीवर खूप चिमटे काढून पाहिले. उड्या मारमारून बुक्के सुद्धा मारले. पण मी काही सुटलो नाही. उलट तिने मला धपाटे घातले ते वेगळंच. मीSS नाहीSSजाणारSS, मीSS नाहीजाSS णारSS, मीनाSS हिजाणारSS, मीनाSS नाहीSS जाणारSS. जिना चढताना मी असलं भजनच सुरु केलेलं. पण पुढे तसाच भजन करत करत मी घराच्या दरवाजापर्यंत गेलो आणि एकदम शांतपणे डायरेक्ट मोरीत जाउन पायावर पाणी ओतू लागलो. कारण आमचं भजन आम्ही घरात पोहोचायच्या अगोदरच चहा पीत बसलेल्या पप्पा आणि आईच्या कानावर जाउन पोहोचलं होतं. त्यामुळे मी दरवाजात जाउन उभा राहिलो तेव्हा आई-पप्पांचे डोळे एवढे मोठ्ठाले आणि लालभडक झाले होते की पहिल्याने कोण मारणार, हे त्यांचं ठरायच्या आधीच माझी चड्डी ओली झाली असती!

                                     रिक्षाने आम्ही थेट बाजारातल्या नगरपालिकेच्या इमारतीपाशी आलो आणि माझ्या डोळ्यात लख्ख कि कसा तो प्रकाश पडला. रश्मीबाई म्हणतात तेच बरोबर. आमच्या डोक्यातली टयूबलाइट लवकर कधी पेटणारच नाही. शेजारच्या नरवणे काकांच्या घरातल्या टयूबलाइट सारखी बटण दाबलं की अगोदर झिक-चिक झिक-चिक करणार आणि तिचं स्टारटर कि काय ते फिरवलं की मग ती प्रकाश देणार. रिक्षातून उतरल्यावर असाच कुणीतरी माझ्या डोक्याच्या ट्युबचा स्टारटर फिरवला असणार, असं मला वाटू लागलं.
                                      संध्याकाळ होती. पश्चिम दिशेला सूर्य महाराज बरयापैकी वर होते आणि नगरपालिकेच्या इमारतीपाठी टोटाळे तलाव होता. माझ्या डोळ्यांपुढे प्रांजलीच्या डोळ्यातल्या सोनेरी लाटा चमकु लागल्या.




                                                                   
                                                                                 उर्वरित गोष्ट पुढच्या आणि शेवटच्या भागात… 




बुधवार, २१ मे, २०१४

१.सोनेरी लाटांची गोष्ट : भाग दोन

                                       
                                        मला टोटाळे तलाव पाहायला मिळतं, ते म्हणजे बाजारात गेल्यावर. रविवारी पप्पांसोबत बाजारात जायचं म्हणजे एक मज्जाच असते. पण आईसोबत बाजारात जायचं म्हटलं तर काही मज्जा नाही. उलट शिक्षाच! कारण आई म्हणजे पण ना आईच आहे. एक तर ती बाजारात गेल्यावर भाजी घेऊन बसलेल्या प्रत्येक बाईकडे जाणार. अशा भाजीवाल्यांच्या टोपल्यांपुढे, फळ्वाल्यांच्या गाडीभोवती आणि कांदे-बटाटेवाल्यांच्या दुकानांपुढे आईसारख्याच  खूप साऱ्या बायकांचा घोळका असतो. अशा ठिकाणी आई खूप वेळ लावते. शिवाय त्या बाकीच्या बुद्धू बायका आपल्याला पुढचं  काही पाहूनच देत नाहीत. मच्छीमार्केट मध्ये सुद्धा आईसोबत जबरदस्ती जावं  लागतं. मच्छीच्या वासाने मला ओकारीसारखं होतं, हे आईला चांगलंच ठाऊक आहे. तरीसुद्धा ती मला हात धरून आत नेणारच. पुन्हा आत सगळीकडे फिरून फिरून शेवटी पहिल्याच मच्छिवालीकडून मच्छी घेणार. आणि आई खाऊ घेणार म्हणजे एकच-वडापाव किवा चुरमुरयाची भेळ.

संपलं.
                                     
                                       शिवाय घरी येताना माझ्या सुद्धा हातात एक-दोन जड पिशव्या देणार आणि रिक्षाने न आणता चालतच घरी आणणार. म्हणूनच आईसोबत बाजारात जायचं म्हणजे कंटाळा गुणिले कंटाळा. पण पप्पांसोबत बाजारात जायचं म्हणजे चांगली संधीचा समानार्थी शब्दच. पर्वणी!
                                        पप्पांच्या हातात हात घालून आपण उड्या मारत बिंदास चालत राहायचं. पप्पा ओरडणार तर नाहीच, उलट त्यांच्या ऑफिसमधल्या गमती-जमती सांगत बसणार. माझ्या शाळेबद्दल, वर्गातल्या मित्रांबद्दल मला विचारणार. बाजारात पोहोचल्यावर मुळीच टाईम लावणार नाहीत. कांदे-बटाटे एकदम पटापट घेणार. भाजी तर माझ्या आवडीचीच घेणार. शापु, मेथी, तोंडली, असलं काही घेणार नाहीत. मच्छीमार्केट मध्ये तर पप्पा मला नेतच नाहीत. समोरच्या हॉटेल मध्ये बसवून, मँगोला किवा थम्स-अप घेऊन देतात. आणि आपण ते पिउन संपायच्या आतच पप्पा मार्केटमधून मच्छी घेऊन येउन पुन्हा आपल्यासमोर उभे! एकदम फाष्ट्च! पण खरी मज्जा त्यानंतर येते. टोटाळे तलावाच्या बाजुलाच रस्त्याशेजारी 'महाराष्ट्र किराणा माल' हे दुकान आहे. त्या दुकानात लोकांची खुपच गर्दी असते. तिथे गेल्यावर पप्पा मला दुकानाच्या बाजूला असलेयला पायरयांवर सावलीत बसवून ठेवतात. तिथून समोरच टोटाळे तलाव दिसतं. मी मग त्याच्याकडे भरपुर वेळ पाहत बसतो. दुपारच्या उन्हात ते तलाव उघडं  पडल्यासारखं वाटतं. ओणवं उभं  राहायची शिक्षा दिलेल्या मुलासारखं बिच्चारं वाटतं. आमच्या शाळेपुढच्या तलावासारखंच हे तलाव सुद्धा चौकोनी आहे. पण खूप मोठं. ते खूप खोलही आहे, असं पप्पा सांगतात. इतकं की पप्पांच्या डोक्यावर आणखी चार माणसं एकावर एक उभी राहिली तरी सर्वात वरच्या माणसाच्या नाकापर्यंत पाणी येईल. तलावाच्या ज्या चौथ्या बाजुला बाजार भरत नाही, तिथे बऱ्यापैकी सावली आहे. नारळाची छानशी झाडं  आहेत. तलावात उतरणाऱ्या लांबच्या लांब दगडी पायऱ्या सुद्धा आहेत. त्या बाजूला जायला मला कधीच मिळालं नव्हतं.

                                        आमच्या शाळेजवळच्या छोट्या तलावात कधी कधी तीन-चार काळीकुट्टं माणसं,  डोक्यावर मोठ्ठाल्या टोपल्या घेऊन येतात. त्या टोपल्यांमध्ये पालेभाजी आणि मूळ्याची भाजी असते. ते लोक ती भाजी तलावाच्या पाण्याने धुतात. त्यानंतर त्याच पाण्याने अंघोळ करतात आणि शेवटी कपडे पण तिथेच धुतात. त्यावेळी तलावाच्या पाण्यावर मस्तपैकी छोट्या छोट्या लाटा तयार होतात. फेसमहाराज त्या लाटांवरून डुलत डुलत ऐटीत तलावाच्या दुसऱ्या काठापर्यंत जातात. कधी कधी खूप साऱ्या  काळ्याकुट्टं म्हशींची टीम तलावाच्या पाण्यात उतरते. त्या म्हशी बुद्धुसारख्या पाण्यात बसूनच राहतात. आम्हाला  गेल्याच महिन्यात  सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातला जलप्रदूषणाचा धडा बाईंनी शिकवला. त्यामुळे तलावाचं  पाणी प्रदूषणयुक्तच  असणार, हे आम्हाला चांगलंच  माहित होतं. पण दरवर्षी तलावात गणपती विसर्जन होतं. आणि विसर्जन झाल्यावर तलावाचं पाणी पुन्हा शुद्ध होतं, असं आमच्या वर्गातली किर्ती किणी सगळ्यांना सांगत असते. किर्ती म्हणजे काय दरवर्षी पैकीच्या पैकी मार्क.  'चिव चिव तेजश्री' नंतर दुसरा-तिसरा तरी नंबर तिचा असणारच. त्यामुळे तिचं बोलणं काय खोटं नसणार, असं बाली मला नेहमीच  सांगतो. पण तरीसुद्धा आमच्या तलावात पाण्याखाली खूप भुतं-बितं असल्याचं आई आणि आत्या मला नेहमी सांगत असते. तलावात दरवर्षी एक-दोन  माणसं तरी बुडून मरतात. मग त्या मेलेल्या माणसांची भुतं होतात. ती भुतं खोल पाण्याखाली लपून बसलेली असतात. आपण तलावाच्या काठाशी एकदम जवळ गेलो, तर ती पटकन आपल्याला खेचून पाण्याखाली नेतात आणि बुडवून मारून टाकतात? नंदीआत्यानं झोपताना असलं काही सांगितलं की आम्ही गारच! मग गोधडी अंगावर घेतली की गुदमरायलाच व्हायला पाहिजे. आपण तलावाच्या हिरव्या-काळ्या पाण्याखाली बुडत चाललोय असंच वाटत राहणार आणि सकाळी उठून पाहिलं की खरोखरंच गोधडी ओली!

                                     
                                        आमच्या तलावाच्या अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण टोटाळे तलावाच्या अशा काहीच गोष्टी मला माहित नव्हत्या. शंतनू, धीरज, जितेश पवार, विश्वास परुळेकर, प्रथमेश खानोलकर, दिपिंती सकपाळ, मधुरा आणि बरीचशी मुलं-मुली पूर्वेला राहतात. पण त्यांच्यापैकी कुणालाही त्या तलावाबद्दल विचारलं की, " त्यात काय एवढं? आहे मोठ्ठ तळं. त्यात नुसतं पाणीच पाणी. काय करायचं एवढ्या पाण्याचं? ", अशा मुली बोलणार. आणि मुलाचं नेहमी एकच ठरलेलं, " ते तलाव काय कामाचं नाही. उगाचच आहे मधल्या मध्ये. त्यापेक्षा त्या जागेवर एखादं मैदान असतं तर खेळायला-बिळायला तरी झालं असतं. बेकार तलाव. "
                                       हि मुलं -मुली मला चक्रमच वाटतात. चांगलं एवढं मोठ्ठालं तलाव आहे तरी यांना त्याचं काहीच नाही. आमच्या पश्चिमेला एकच तलाव, ते पण छोटं. तरीसुद्धा आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. तलाव आमची शानच आहे. पण या पुर्वेकड्च्यांना त्यांच्या एवढ्या मोठ्ठ्या तलावाचं काहीच वाटत नाही. फक्त प्रांजली सोडून. कारण प्रांजलीला तलाव खूप आवडतो. मी कधी तिला तलावाबद्दल विचारलं, की ती पहिले दोन्ही हात तोंडावर ठेवून खो-खो हसते. तिला तसं हसताना पाहून मग मला पण वेड्यासारखं हसायला येतं. प्रांजलीसोबत बोलताना कुणीही तिच्या डोळ्यांकडेच पाहत बसणार. तिचे डोळे खूप मोठ्ठे आहेत आणि ते तलावाच्या पाण्यानेच भरल्यासारखे वाटतात.
                                   
                                     " आमचं तलाव किनई खुपच्या खूपच छान आहे. एकदम शहाण्या बाळासारखं शांत. पावसाळ्यात किनई ते एकदम काठोकाठ भरतं. आणि तुला सांगू कधी-कधी त्यात किनई पाणबगळे आणि पाण कोंबड्या सुद्धा येतात. ते उडता उडता  किनई पटकनशी पाण्यात बुडी मारतात. आपल्याला वाटतं की बाई बुडालेच ते! पण तसं नसतं काही! ती त्यांची किनई एक गम्मतच असते. मग ते गपकन पाण्याबाहेर येतात आणि तुला सांगू त्यावेळी त्यांच्या चोचीत किनई एक चंदेरी मासा असतो. ते त्याला तसेच खातात आणि पाण्यावर किनई बोटीसारखे तरंगत राहतात. आणि तुला सांगू पौर्णिमेच्या रात्री किनई चंद्र तलावाच्या पाण्यात उतरतो. त्याला पाहून नमस्कार केला, की पाठ केलेलं सगळं लक्षात राहतं असे माझे आजुबाबा सांगतात. आणि तुला सांगु सर्वात जास्त मज्जा किनई संध्याकाळी असते. तेव्हा लालेलाल सूर्य किनई हळू-हळूच पश्चिम दिशेला उतरत असतो. तेव्हा आपण तलावाच्या दगडी पायऱ्या आहेत किनई तिकडे जाऊन बसायचं. मग सूर्यदेव बरोब्बर आपल्या समोर! तेव्हा  किनई एक मोठी जादूच होते! तलावाच्या पाण्यावर वाऱ्यामुळे किनई छोटया छोटया लाटा पळत असतात. आणि तुला सांगू सूर्याची सोनेरी सोनेरी किरणं त्या लाटांवर पडतात आणि मग तलावाचं सगळं पाणीच सोनेरी सोनेरी दिसतं. त्या सोनेरी लाटा पाहायला आमचे आजुबाबा किनई मला दर शनिवारी आणि रविवारी त्या दगडी पायऱ्यांजवळ नेतात आणि तुला सांगू……  "

                                      प्रांजली सोबत बोलायचं म्हणजे मधली सुट्टी छोटीच वाटणार. तिचं बोलणं म्हणजे त्या रेल्वेच्या रुळांसारखंच. स्टेशन मधून निघाले की बेटे गेलेच लांबच्या लांब. कुठे संपायचं नावच  नाही. पण तरीसुद्धा मला प्रांजलीचं बोलणं खूप मस्त वाटतं. त्यात ती 'किनई' हा शब्द तर भरपूरच वेळा बोलते. प्रत्येक वाक्यामध्ये एकदा तरी किनई असणारच. वर्गातली मुलं -मुली सुद्धा तिला 'किनई'च बोलतात. " अगं किनई,  आम्ही सगळ्या किनई कधीच्या डबा उघडून बसलोय किनई, ये किनई डबा खायला.  नाहीतर किनई बेलच किनई होणारssss. असलं कायतरी मुली तिला बोलणार. पण 'किनई'  किनई कधीच रागावणार नाही. उलट दोन्ही हात तोंडावर ठेऊन खो-खो हसणार. मी मात्र तिला नेहमी प्रांजलीच म्हणतो. कारण नंबर एक-तिचं नाव खूपच छान आणि वेगळं असल्याचं पप्पांनी मला सांगितलंय आणि कारण नंबर दोन म्हणजे, तिच्याशी कधी पण  बोलायला जा ती नीट बोलणार आणि भरपूर बोलणार.
                                     आमच्या वर्गात एकूण तीन प्रकारच्या मुली आहेत. प्रकार नंबर एकच्या मुली एकदम भांडखोर आणि चिडक्या. खेळताना हज्जार वेळा चिडाचिडी करणार. पुन्हा नखं-बिखं मारायलाही अंगावर धावत येणार. प्रकार नंबर दोनच्या मुली म्हणजे एकदम शांत. कधीच कुण्णाशीच जास्त बोलणार नाहीत. मुलांशी तर नाहीच नाही. त्यांना कुणी काय बोललं किवा चिडवलं तर लगेच जाउन बाईंना नाव सांगणार. एक नंबर चोंबड्या! प्रकार नंबर तीनच्या मुली मात्र आमच्याशी नीट बोलणार, खेळणार, भांडणारसुद्धा! पण बाईंना उगीच नावं सांगणार नाहीत. गृहपाठाची वही, गोष्टीची पुस्तकं, बाटलीतलं पाणी, खोडरब्बर, शार्पनर काही पण मागा  लगेच देणार.
                                     प्रांजली या तिसऱ्या प्रकारातली होती.






                                                                                                      … उर्वरित गोष्ट पुढच्या भागात






शनिवार, १७ मे, २०१४

१. सोनेरी लाटांची गोष्ट : भाग एक


             
                                        ते तलाव म्हणजे अगदी तलावच आहे. त्याचं  नावही आम्हाला सगळ्यांना जाम  येड्च्याप  वाटतं. टोटाळे  तलाव.  टोटाळे?  तशी त्याची आणखीनसुद्धा  नावं आहेत. मोठी माणसं त्याला म्हणतात 'मोठं  तलाव' किवा 'पुर्वेकडचं तळं' किवा कुणी म्हणतं,' बाजारातलं तळं'.

                                         तलाव तसं  आमच्या विरार रेल्वे स्टेशनच्या बऱ्यापैकी  बाजुलाच  आहे.  म्हणजे स्टेशनच्या पुलावरून जर आपण पूर्वेकडे उतरायला गेलो नं कि समोरच तलाव दिसणार. पुलावरून खाली आलं  की  आडवा रस्ता, त्याच्यापलीकडे नगरपालिकेचं छोटुसं मैदान आणि त्याला चिटकूनच पाठीमागे ते कुणीतरी, कधीतरी तयार केलेलं  अवाढव्य तळं. तुम्हाला वाटेल की हे तसं  बरंच  जवळ आहे की!  पण महाराज हा जो मधला आडवा रस्ता आहे ना, तोच पार करून जायला टाईम  जाणार.  कारण तिथे असतो बाजार.  भाजीवाले, फळवाले, प्लाष्टीक सामानवाले, फुलवाले, हातगाडीवाले गोळा-सरबत वाले, कपडेवाले, कुल्फीवाले,  फुगेवाले, गोड कापुसवाले, चम्मच-सुरी विकणारे, भांडीवाले  इत्यादी इत्यादी…  त्या इत्यादी इत्यादींनीच तो रस्ता भरून गेलेला असतो.  शिवाय त्या बाजारात आलेली माणसं, बायका यांच्या एका हातात भरपूर पिशव्या असणार आणि दुसऱ्या हातात त्या बाजाराला कंटाळलेल्या आमच्या एवढ्या मुलगा किवा मुलगीचा हात.  शिवाय एवढ्या गर्दीतूनही प्या-प्या-प्या- करत अंगावर येणाऱ्या काळ्या-पिवळ्या रंगाच्या रिक्शा, मोठ्ठाले टेम्पो आणि ट्रकांच्या  आवाजाने आपलं  डोक  तर दुखणारच.  तलावाच्या तीनही बाजूंनी असा  गडबडबाजार रोजच्या रोज भरलेला असतो.  सगळीकडून गर्दीच गर्दी.  आणि त्या गर्दीच्या मधेच ते गुपचूप पडून राहिलेलं  तलाव.  तलाव तसं  फार मोठं नाही.  छोटंही नाही.  एकदम बऱ्यापैकी.

                                       आमचं  विरार म्हणजे काही एकदम मोठं शहर नाही काही! बाई म्हणतात की  ते एक छोटं नगर आहे. पण कुणीतरी वेड्यासारखे आमच्या नगरच्या बरोबर माधून  रेल्वे रूळ बांधले आहेत. त्यामुळे रेल्वे रुळांच्या या बाजुला  विरार पश्चिम आणि त्या बाजूला विरार पूर्व असे आमच्या विरारचे दोन  भाग पडले आहेत. विरार  पूर्वेला मोठ्ठा  जीवदानी देवीचा  डोंगर आहे त्यावर  जीवदानी  देवीचं  मोठं  मंदिर आहे.  खूप लांब पापडखिंडीचं धरण आहे.  फुलपाडा, मनवेलपाडा आहे.  गावडेवाडी,  गोपचरपाडा, पाचपायरी  आहे.  बाजार आहे.  बाजारातलं  नगरपालिका वाचनालय आहे आणि सगळ्यात महत्वाचं  म्हणजे ते  तलाव आहे.
                                       पण आमचं  विरार पश्चिम ही काही कमी नाही हं ! उलट जास्तीच! आमच्या पश्चिमेला आमची विद्यानिकेतन शाळा आहे.  शाळेपुढचं  छोटं  तळं  आहे.  दरवर्षी जिथे जत्रा भरते ते राम मंदिर आणि डोंगरपाड्यातलं राधा-कृष्ण मंदिर आहे. खेळायला हिराविद्यालायचं मैदान आहे.  मस्तपैकी कौलारू घरं  आणि ऐटदार बंगले असलेले डोंगरपाडा, चोरघे आळी आणि मी राहतो ती  कोलवाडी आहे.मातीचे मडके बनविणाऱ्यांची कुंभारआळी  आहे.  हिरवीगार शेतं  आहेत. शेतांसारख्याच हिरव्यागार दलदली आहेत.  पावरफुल  भुतांचं  स्मशान आहे.  चिखलडोंगरी  गावात जाणारा चेटकीणींचा  रस्ता  आहे.  खूप लांब जिथे नारळाच्या झाडांची आडवी, न संपणारी रांग दिसते, त्यापलीकडे आगाशी, अर्नाळा गावं  आहेत.  अर्नाळ्याला तर मोठ्ठाला समुद्र पण आहे.  आणि नुसता समुद्रच नाही तर त्याच्याआत पाण्यात किल्ला पण ! इतकंच  नाही, विरार मधलं  सगळ्यात टॉप चं  श्रेया हॉटेल, एकच्या एक असलेलं  वूडल्यांड थिएटर  आणि दळवी काकांची भरपूर फ़ेमस वडापावची गाडी पण पश्चिमेलाच आहे.  म्हणजे तुम्हाला कळलं नं ? विरार पूर्व पेक्षा आमच्या विरार पश्चिमेलाच खूप चांगलं चांगलं  आहे.  पण हे त्या पूर्वेला राहणारया  आमच्या वर्गातल्या बुद्धू मुला-मुलींना कळतंच नाही. सारखे भांडतात.
                                   
                                      आमच्या शाळेपुढचं  तलाव  टोटाळे  तलावापेक्षा खूपच लहान आहे. म्हणजे या तलावाच्या सारखे आणखी सहा तलाव एकत्र केले तर एक टोटाळे तलाव होईल, असं  आमच्या वर्गातला शंतनू सावंत  बोलतो.  त्याचा कुणीतरी काका की  कुणीसं तलावाजवळ राहतं  म्हणे; आणि त्यांच्या घराच्या खिडकीतूनच तलाव दिसतं, असं  तो म्हणतो. पण शंत्या पक्का खोटारडा आहे. वर्गात शायनिंग मारण्यासाठी तो भरपूर खोटं बोलत असतो. सुरुवातीला आम्हाला पण त्याचं बोलणं  खरं  वाटायचं. एकदा त्याने शाळेच्या समोर असलेल्या चिंचेच्या झाडाला दोन डोळे आलेले पाहीले. मैदानातल्या घसरगुंडीवर बसून आम्ही आठ-नऊ मुलं त्या झाडाकडे नीटच  पाहत होतो. शंत्याने आम्हांला झाडाच्या खोडावर आलेले दोन डोळे दाखवले. पण त्यानंतर आमच्यातल्या प्रत्येकालाच त्या झाडावर ठिकठिकाणी डोळे दिसू लागले. चिऱ्या जाधवला तर वरच्या दोन मोठ्या फांद्या या राक्षसाच्या हातासारख्याच दिसू लागल्या. हळूहळू त्या झाडाच्या जागी भरपूर डोळे आणि हात असलेला राक्षसच उभा असल्यासारखा आम्हाला वाटू लागला. भिती वाटून आमच्या पोटात दुखायला लागलं . धपाधप उड्या  टाकून आम्ही साऱ्यांनी वर्गात धूम ठोकली. चिंचेच्या झाडामध्ये गिऱ्या  राक्षस राहतोय, त्याला खूप सारे हात आणि डोळे आहेत, त्या डोळ्यांमधून तो आपल्याकडे रागाने पाहतो, अशी बातमी बालवाडीच्या वर्गापासून ते चौथीच्या वर्गापर्यंत वाऱ्यासारखी  पसरली. मधल्या सुट्टीत खूप आरडाओरडी झाली. पहिली-दुसरीची पोरं  तर उगाच इकडे-तिकडे कोकलत पळत होती. सुट्टी संपून बाई वर्गावर आल्या तरी आम्ही सगळे  भितीने  कुजबुजत होतो.  कारण शाळा सुटल्यावर आम्हां  सगळ्यांना त्याच चिंचेच्या झाडाजवळच्या रस्त्याने घरी जायचं होतं. तेव्हा त्या झाडाने  पटकन आपल्या फांद्या पुढे करून कुणाला मिठीच मारली तर ? बाम भोले! शेवटी वर्ग मॉनिटर नेहाने भितभितच चिंचेच्या झाडाचं अख्ख्या शाळेला कळलेलं  गुपित बाईंना सांगितलं. त्यावरून मग नेहाला ओरडा, डोळ्यांचा शोध लावलेल्या आम्हां  आठ-नऊ  जणांना  हातावर  दोन-दोन पट्ट्या आणि अख्ख्या  वर्गाला दम भरून झाल्यावर बाईंनी," हे असं  काही नसतं, सगळे आपले भासच असतात", असं  काहीतरी बरंच  सांगितलं.
                                     त्यादिवशी शाळा सुटल्यावर शंत्याला  आम्ही आठ-नऊ जणांनी चांगलाच धुतला. घरी जाताना त्याच्याच कपाळावर दोन डोळे आले होते. असला तो शंतनू सावंत! पण तरीसुद्धा पुढे कितीतरी दिवस त्या चिंचेच्या झाडाजवळून जाताना ते झाड त्याच्या आठ-दहा डोळ्यांपैकी कुठल्या तरी डोळ्यांनी आपल्याकडे पाहतंय असं  वाटून पोटात दुखुच लागायचं. मग झाड जवळ आलं  की  आम्ही धूम पळणारच!

                                                                                                                                     
                                                                                                     
                                                                                                      … उर्वरीत गोष्ट पुढच्या भागात                                          















शुक्रवार, ९ मे, २०१४

सुरुवात करण्या अगोदर थोडंसं

                                                           
   
                           दररोज सूर्य उगवत होता नि मावळत होता.दिवस येत होता नि जात होता. आपण उठत होतो नि झोपत होतो. झोपून  पुन्हा उठत होतो. सगळं कसं कुणीतरी ठरवून दिल्याप्रमाणेच चालत होतं. परत परत तेच तेच. आपलं म्हणजे त्या समुद्रातून येणाऱ्या लाटांसारखंच झालं होतं. रोज रोज एकाच किनाऱ्यावर.तेही एकापाठोपाठ. पी. टी. च्या पिरिएडला समोर बाई असताना नीटपैकी रांगेत मुलं वर्गाबाहेर पडतात ना तसंच अगदी.
                         ......................................................................................................................

                           फार फार वर्षांनी आता किनाऱ्यावरून त्या लाटा पाहताना जाणवलं , की प्रत्येक लाट जरी सारखीच भासत असली तरी त्या प्रत्येकीत काहीतरी वेगळं आहे. दिशा, गती आणि शेवट जरी सारखा असला तरी एक विलक्षण फरक त्या प्रत्येक लाटेमध्ये आहे.प्रत्येक पोरगा किंवा पोरगी एकाच रांगेत चालत वर्गाबाहेर पडत असले तरी मैदानावर पोहोचेपर्यंत प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं असणार आहे.


                           तेच "काहीतरी वेगळं " या सोनेरी लाटांच्या गोष्टींत असणार आहे.