शुक्रवार, १ ऑगस्ट, २०१४

२. खजिना : भाग चार

                                      आम्ही सगळे दुकानापाशी जाउन थांबलो. नानी आणि नंदी आत्या दुकानातल्या मारुती दादाच्या बायकोसोबत बोलू लागल्या. नाना मला एष्टी कुठे-कुठे आणि किती-किती वेळ थांबणार ते सगळं सांगत होता. हळु-हळु  आमच्या भोवताली बरीच गर्दी जमायला लागली. पिकचर मध्ये हिरो-हिरोईनला गुंड लोक घेरतात तसं घेरूनच टाकलं आम्हाला सगळ्यांनी! पण ते गुंड-बिंड नव्हते, त्यामुळे मला बरं वाटलं. एवढ्या सगळ्या बायका, म्हातारया आज्ज्या, पोरं-पोरी कशाला आले विचारायचं कामच नाही. आज्जीनेच त्यांना रस्त्याने चालत दुकानापाशी येताना हाका मारमारून बोलावलं असणार. अगदी नक्कीच! कारण ते सगळे माझ्याकडेच टक लावून पाहात होते. त्यातल्या कुणीतरी बायका येउन माझ्या डोक्यावरून, गालावरून हात फिरवत होत्या. आणखी कुणी "आत्ता पुन्ना कंदी रं येशील बावा? तुझ्या मम्मी-पप्पासला घेऊन ये", असलं कायतरी बोलत होत्या. मला काय बोलायचंच नव्हतं. कारण बोलायचं काम आमच्या आज्जीने जोरातच चालवलं होतं.
                                      अचानक दुरून एष्टीचा 'घ्यँग ग्यँग' आवाज ऐकायला येऊ लागला. मी रस्त्यावर नीटच पाहू लागलो. थोड्याच वेळात कुल्याप्पा, विन्या आणि बाकीच्या पोरांची गँग आपापला गाडा हाकत धावत येताना मला दिसली. त्यांच्या पाठोपाठ रस्त्याला लागून असलेल्या आब्याच्या घरामागून एक लाल-पिवळी एष्टी ऐटीत वळण घेऊन समोरच्या सरळ रस्त्यावर आली आणि पाहता-पाहता आमच्याजवळ येउन दम टाकत उभी राहिलीसुद्धा! तिच्या मोठ्ठाल्या काचेपाठी 'उन्हवरे - मुंबई' अशी पाटी थरथरत होती. दरवाजा उघडून नंदीआत्या आणि मी आत चढलो. आमची शीट शोधून नानाने आमचं सामान लावून दिलं आणि लगेच तो खाली उतरला. झटकन कंडक्टर काकांनी बेल वाजवली आणि पटकन कुणीतरी धक्का दिल्यासारखं करून एष्टी चालू झाली. त्या सगळ्या गडबडीत माझ्या डोळ्यात धूळ उडाल्यामुळे मी डोळे चोळत राहिलो. चांगलं डोळ्यातून पाणी-बिणी येईपर्यंत चोळून झाल्यानंतर मी नानीला टाटा करण्यासाठी खिडकीबाहेर पाहायला गेलो, तर एष्टी होळीच्या शेतापर्यंत पुढे निघून आली होती.

                                      मला कसंतरीच वाटायला लागलं. विंडोशीटवर बसून मी खिडकीबाहेरचा देखवा पाहत होतो. पण तो पाह्ताना मला रोजच्यासारखी मजा येत नव्हती.
                                      कुणीतरी मुद्दामहून सोडल्यासारखा बिनडोक वारा खिडकीतून सरळच्या सरळ आत येउन माझ्या चेहरयावरच आपटत होता. ड्रायव्हर साहेब गाडी उगीचच्या उगीच नको तेवढी सुसाट चालवत होते. त्यामुळे घरं, झाडं-झुडुपं, शेतं, नद्या- डोंगरं सगळं पटापट मागे पडत चाललं होतं. दुपार असूनसुद्धा उन पडलंच नव्हतं. आकाशातले सफेद ढग कुठेतरी पळून जाउन लपून बसले होते. त्यांना शोधण्यासाठी एका मोठ्ठया काळ्या ढगावरती राज्य आलं होतं. मधूनच कुठल्यातरी ढगाच्या पोटात गुडगुड काय होत होतं, मध्येच वीज काय लपून चमकत होती आणि तर आणि पाउससुद्धा छोट्या शेंबड्या पोरासारखा येउन, चिडवून पटकन पळून जात होता. जमिनीवर कुठे-कुठे पोपटी गवत उगवलेलं आणि कुठे-कुठे तर त्याला उगवायचं विसरल्यासारखंच झालं होतं. मला बाहेर बघायचा आणखीनच कंटाळा येऊ लागला. त्यामुळे वैतागून जाउन मी डोळेच मिटून घेतले.

सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. पुन्हा एकदा मी त्याच अंधारया गुहेत एकटा उभा होतो. माझ्या पायाजवळ एक गुलाबी रबरी बॉल पडून होता. कुल्याप्पानं जोरदार सिक्सर मारून दीपाताईच्या घराच्या मागच्या परसात घालवलेला रबरी बॉल! तोच तो. आम्ही कितीतरी वेळ शोधूनसुद्धा सापडलाच नव्हता तो. पण फक्त मलाच असं वाटत होतं की तो पेरूच्या झाडाजवळच्या बिळातच गेला असणार म्हणून. त्या चमन गोटयाला मी उचलून घेतलं. त्याला हातात गच्च पकडून मी पळू लागलो. 
पळतच मी त्या गुहेच्या बाहेर आलो. ती दीपाताईची परसबाग होती. पेरूच्या झाडावरचे दोन-तीन पेरू मला पाहून हळूच पानांआड लपले. ते पाडण्यासाठी मी दगड शोधायला पुन्हा पळालो. 
नदीच्या काठाजवळून मी भरपूर रंगीबेरंगी खडे खिशात भरून घेतले. बाजूच्या झाडीत 'आब्या ' उभा होता. लाडूएवढया आकाराची काळी-काळी करवंद त्याच्या हातात होती. आम्ही दोघं पळत पळत विहिरीपाशी आलो. 
विहिरीतलं कासव पाण्याच्या वर येउन आमच्याकडेच हसत पाहत होतं. 
"या ", ते म्हणालं. 
रोंगीताईनं आमच्या डोक्यावर एक-एक कळशी ठेऊन दिली. ती सांभाळत आम्ही पायवाटेनं घराच्या दिशेनं चालू लागलो. आमच्यापुढे मीनाताई दोन हंडयांच्यावर एक कळशी डोक्यावर घेऊन चालली होती. 
राक्याच्या अंगणात राक्या गळ्यात बेचकी अडकवून ऐटीत उभा होता. बाजूला त्याची गोल-गोल पापड लाटण्यात पटाईत असलेली शमाताई अंगण झाडत होती. 
मी त्या पायवाटेने घरी निघालो होतो. 
त्या पायवाटेच्या आजूबाजूला बरीच माणसं येउन उभी राहिली होती. ओळखीचीच होती ती सगळी. 

प्रत्येक मॅचमध्ये चिडचिडी करणारा सत्तुदादा, झाडाच्या पार वरच्या फांदीपर्यंत चढणारा वैब्या, रडकू रामा, दिवसभर नुसता गाडाच फिरवत बसणारा डबडू, नेहमी केसात अबोलीच्या फुलांची वेणी घालणारी मीनाताई, आमसुलं खायला देणारी आशाताई, ढोकी वाजवताना डोळे बंद ठेवणारे संदीपदाचे बाबा, दुकानातला मारुतीदादा, चक्कीवाले पांढरेकाका, बैलगाडीवाला मंग्यादादा, देवळातली बयोआज्जी, चीकारी आंब्याजवळच्या घरातली खडूस जनीआज्जी, दिवसभर बडबड करणारी आमची आज्जी, झाडावर कितीपण मुंगळे असले तरी त्याच्यावर चढून आंबे काढणारा नाना… सगळेच्या माझ्याकडेच पाहून हसत होते. लाडातच!

लांबूनच मला घराच्या पडवीत खुर्चीत बसलेले अण्णा दिसले. ते पण माझ्याकडेच पाहून हसत होते. मी पटापटा चालत माझ्या आमच्या अंगणाजवळ आलो. अंगणाच्या दारातच एक हसरी बाई उभी होती. छानपैकी बारकुशा फुलाफुलांच्या नक्षीवाली साडी घातलेली, घारया डोळ्यांची. बाहूलीच जशी. नानीच ती!
मला काजुबियांची भाजी, पाटयावरची चटणी, गोड शेंगा असलं सगळं माझ्या आवडीचं बनवून देणारी, मला रानात, नदीवर, विहिरीकडे फिरायला नेणारी, माझे लाड करणारी माझी गोड गोड नानी. 
नानीने माझ्या डोक्यावरची कळशी उतरण्यासाठी हात पुढे केले. ती कळशी उतरणार, तेवढ्यात कुणीतरी मला जोराचा धक्काच दिला. 
"शीट नंबर पस्तीसssss -पाठी जा -पाठी जा sss-तिकीट दाखवाsss तिकीट -टींग टींग, तिकीटsss टांग टांग टींग,खाड खाड- नंबर पस्तीसsss, घँग-गँग-ग्याँय्य्यय्य्य्यांग गँगँग, लगेजss लगेजss, टींग टींग रिजर्वेशनsss" एक अख्खाच्या अख्खा खाकी शर्ट आणि लांबोडकी खाकीच पँट घातलेला लाल डोळ्यांचा माणूस होता तो. त्याच्या एका हातात तीक्टींना भोक पाडायचं यंत्र होतं. हळू-हळू तो माणूस मोठा मोठाच व्हायला लागला. त्याच्या हातातलं ते यंत्र तर कुल्याप्पाच्या बॅटीएवढं मोठं झालं. त्या राक्षसाने त्याचा दुसरा भलामोठा हात पुढे आणून माझ्या शर्टाची कॉलरच धरली आणि लगेच त्याने त्याच्या दूसरया हातातलं यंत्र माझ्या छातीवर धरून 'खटॅक्क' करून दाबलं!
माझ्या छातीवर रबरी बॉलएवढं मोठ्ठं गोल भोकच पडलं. त्यातून लालेलाल रक्त बाहेर यायला लागलं. 
रक्ताच्या रंगसारखीच एक लालेलाल एष्टी बाजूला उभी होती. त्या खाकी राक्षसानं मला उचलून त्या एष्टीत फेकलं. मी खिडकीतून आरपार जाउन आडवातिडवाच शीटवर पडलो. 
एष्टीत देवळातल्या घंटेएवढी मोठ्ठी घंटा लावलेली होती. तिला जी मोठ्ठी दोरी बांधलेली होती त्याचं दुसरं टोक त्या राक्षसानं हातात धरून जोरात दोनदा ओढलं. जोराचा खोकला आल्यासारखं घसा खाकरून आणि धूर थुंकून एष्टी चालू झाली. 
मी खिडकीतून खाली पाहू लागलो. रस्त्यावर मघाचीच सारी माणसं जमली होती. मी त्यांच्यापासून लांब चाललो होतो. यावेळी माझ्या डोळ्यात जायला धुळबिळ नव्हती. तरीही डोळ्यातून खूप सारं पाणी येत होतं. डोळ्यांसमोर आलेल्या त्या पाण्याच्या पडद्यापाठी खजिन्याचा सोनेरी प्रकाश हळू-हळू कमी होऊ लागला. गुहेतला अंधार मात्र भसाभसा वाढू लागला. 

                                      मौल्यवान खजिना पाठीमागे टाकून आमची एष्टी सुसाट वेगाने पळत होती. एका मोठ्ठया अंधारया गुहेतून. पण खजिन्यापासून लांब. उलट दिशेने.






                                                             
                                                    _______***समाप्त***_______ 


                                                                                कशी वाटली गोष्ट? 
                                                                                जरूर कळवा… 




बुधवार, २३ जुलै, २०१४

२. खजिना : भाग तीन

                                        एके दिवशी मी घरातल्या सगळ्यांसाठी पेप्सीकांडी घेऊन आलो. अण्णांना सुद्धा आम्ही एक लेमनपेप्सी दिलेली. ते पेप्सी खात असताना मी लपूनच त्यांना पाहत होतो. पेप्सी मस्तपैकी खाउन झाल्यावर अण्णांनी पेप्सीचा प्लाष्टिक कागद हातातच धरून ठेवला आणि ते त्यावरची इंग्रजी अक्षरं वाचू लागले. अण्णा!

                                       अण्णांना काहीतरी वाचताना मी पहिल्यांदाच पाहत होतो. पटकन मला एक युक्ती सुचली. गावाला येताना मी ठकठक, चांदोबा, चंपक असली चार-पाच गोष्टींची पुस्तकं वाचायला म्हणून आणली होती नि पहिल्या दोन दिवसांतच वाचून संपवलेली सुद्धा. त्या दिवशी संध्याकाळी अण्णा पडवीतल्या त्यांच्या खुर्चीत चहा पीत बसले असताना मी गुपचूप ती पुस्तकं त्यांच्या कॉटवर उशीशेजारी ठेऊन दिली. थोड्याच वेळाने अण्णा येउन कॉटवर बसले. त्यावेळी मी काजूच्या बिया मोजण्याचं काम लक्ष देऊन करत होतो. म्हणजे हाताने बिया मोजत होतो, पण लक्ष मात्र अण्णांवर ठेऊन. अण्णांनी पुस्तकांकडे एकदाच सरळ पाहिलं आणि पुन्हा ते नेहमीच्याप्रमाणे त्यांचा भिंतीकडे टक लावून बघण्याचा कार्यक्रम करू लागले. फुस्स्स!
माझा प्लॅन साफ फसला. बिया मोजण्याच्या तश्श्शाच ठेऊन मी रागाने स्वयंपाकघरात, चुलीजवळ जाउन बसलो. मला भूक लागलीये असं वाटून नानीने मला बुद्धूसारखं जेवायलाच वाढलं. शिवाय आणि मी डब्बल बुद्धू रागारागाने जेवलोसुद्धा!
                                       मोरीत हात धुवून मी जेव्हा वरती माझघरात जायला लागलो तेव्हा दारातूनच मी पाहिलं. अण्णांच्या हातात चांदोबा होतं!! ते मस्तपैकी झोपून-बिपून ऐटीत पुस्तक वाचत होते.

लाडातच!

                                      अण्णांचं बरोबरच होतं. विरारला आमच्या चाळीच्या पुढे जी कौलारू आडवी चाळ आहे की नाही, त्यातल्या शेवटच्या घरापुढल्या जागेवर कोपरयात तीन-चार बालवाडी, पहिलीतली पोरं-पोरी मिळून 'घरपणी' खेळत असतात. मस्तपैकी लाकडी पाट वगैरे  लावून, जत्रेतली खेळण्यातली भांडीकुंडी ठेऊन ते खेळतात. त्यांच्या खेळामध्ये शेतावर जाणारे बाबा असतात, जेवण बनवणारी आई असते, त्यांची दोन मुलं असतात. रात्रीचं जेवण केल्यानंतर ते लोक बुद्धुसारखे तिथेच रांगेत झोपतात सुद्धा! लाडातच.
                                     त्यांच्या बाजूला बसून त्यांचा खेळ बघत बसायला मला फार आवडतं. एकदा आईने दिलेल्या एक रुपायाचे चणे घेतल्यावर मी त्यातले अर्धे त्यांना खायला दिले तर त्या बुटक्या लोकांनी एकेका चण्याचे छोटू-छोटूशे तुकडे करून डाळभातासारखे खाल्ले!

                                       पोरं म्हणजे पण ना बोरंच आहेत ती. पण पिकलेली. गोड गोड. त्यांचा खेळ पाहून मलाही त्यांच्यासोबत फार खेळावंसं वाटतं. घरातून लाकडी पाट आणावा आणि त्यावर रंगीबेरंगी खडे, काडेपेटी, झाडांची फळं, पानं-फुलं तोडून आणून छानपैकी दुकान थाटावं आणि त्यांच्या खेळातला दुकानदार दादा व्हावं. ऐटीत दुकान चालवावं. पण हे होणार थोडीच!त्यांच्यासोबत असलं काय खेळताना कुणी मला बघितलं की संपलंच.
                                      'आयलट- बायलट पोराची पोरगी, आपला आक्शय झालाय पोरगी' असं अख्खी वाडी चिडवायला लागणार. पुन्हा काही खेळायला गेलं की खेळात आपल्यालाच बकरा करणार. आपल्यावरचं राज्य मग अंधार पडेपर्यंत जायचं नाव नाही. अण्णांनासुद्धा त्या पुस्तकातल्या गोष्टी आपण वाचाव्यात असं मनापासून वाटत असणार पण ती छोट्या मुलांच्या गोष्टीची पुस्तकं वाचताना आपल्याला कुणी पाहिलं तर चिडवतील, असली भीती त्यांना वाटत असणार. नक्कीच.

                                      अजुनी मला चुलीजवळ बसलेलं पाहून नंदिआत्यानं आरडाओरडच सुरु केली.तिच्या आवाजाने कंटाळून टोपलीपाठची मनीसुद्धा बाहेर येउन तिची ऐटदार शेपटी उडवत आळस देत- देत परसात निघून गेली. मला पण मनीसारखं आळस देत परसात जायचं होतं पण तसं करणं आता फारच धोक्याचं होतं. मला भरपूर रागावल्यावर नांदी आत्या पाय आपटत माळ्यावर निघून गेली. नानीनं माझ्यासाठी तपेल्यातलं गरम पाणी बादलीत ओतून दिलं. मग मी माझा टॉंवेल घेण्यासाठी माजघरात गेलो तर नाना, आज्जी, नंदिआत्या यांची फौज एकत्र होऊन माझ्यावर जोरजोरात रागावू लागली. त्याचं चक्रव्युह तोडून मी कसा-बसा पुन्हा मोरीत आलो तर आज्जी मराठ्यांसारखा पाठलाग करत माझ्यामागून मोरीपर्यंत आली! शेवटी तिने पुन्हा एकदा फिरून सगळ्यांवर रागावून झाल्यानंतर मी अंघोळीला सुरुवात केली.

                                      सर्व तयारी झाली होती. मी, नंदीआत्या नवीन कपडे घालून बसलो होतो. गाडी येण्याची वेळ झाल्यावर मी देवघरातल्या देवांच्या पाया पडलो. घरातल्याही सगळ्यांच्या पाया पडलो आज्जीच्या पाया पडायला गेलो तर ती रडायलाच लागली नानीच्या पाया पडायला गेल्यावर तिने मला जवळ ओढून घेतलं. तिच्या साडीच्या पदराला जो मस्तपैकी छान आणि ओळखीचा असा वास येत असतो तो कुठल्या तरी डबीत भरून घेऊन आपण सोबत नेला पाहिजे, असंच वाटलं मला.

"मस्ती करू नको. शाळेत नीट जात जा. आईला त्रास देऊ नको आणि गणपतीच्या सुट्टीत लवकSSS र परत ये SSS ऐकलंस?" नानी म्हणाली.
"होSSS , पण तू  मनिला दुध आणि खाऊ देत जा." मी सुद्धा नानीला एक महत्वाची सूचना देऊन टाकली.

"पण आहे कुठं तुझी मनी?"

                                      आम्ही मनिला हाका मारून पाहिल्या. ती कुठेच दिसत नव्हती. तेवढ्यात खिडकीतून आम्ही पाहिलं की, नाना आमची कपड्यांची बॅग घेऊन दुकानाकडे जात होता आणि त्याच्यामागून जणू काही ती स्वतः चीच बॅग असल्याच्या तोऱ्यात मनी कुणाकडेच न पाहता अगदी ऐटीत शेपटी उडवत चालली होती.

लाडातच!!






                                                                                                    उर्वरित गोष्ट पुढील भागात …


   

शुक्रवार, ४ जुलै, २०१४

२. खजिना : भाग दोन

                                      एका वर्षामध्ये असतात बारा महिने. एकूण दिवस तीनशेसाठ. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.. पुन्हा तेच चक्र सुरु. अण्णा कधीच घराच्या बाहेर जात नाहीत. फक्त माझघरातली कॉट आणि पडवीतली खुर्ची. एकदा मी त्यांच्या त्या लाकडी खुर्चीत बसून पाहिलं. तिथून आमचं घराबाजूचं शेत, शेतातलं नारळाचं झाड, त्यापुढे आडवा गेलेला डांबरी रस्ता आणि रस्त्याच्या पलीकडची घरं, असलं सगळं छानच दिसत होतं. पण किती वेळ? मला कंटाळा यायला वेळ लागलाच नाही. पण मग अण्णांना कंटाळा येत असणार कि नाही? रस्त्यावरून अण्णांएवढे किंवा त्यांच्यापेक्षाही म्हातारे आजोबा लोक इकडे-तिकडे जात असतात, त्यांच्याकडे पाहून अण्णांना कसं वाटत असणार? कुल्याप्पा, विन्या, अभी असले माझे मित्र आले की आमच्या अंगणात आम्ही खूप खेळ खेळतो. दुपारच्या वेळी बाहेर पाहिलं तर गायी-बैलं ढिम्मपणे इकडे-तिकडे फिरत असतात. संध्याकाळच्या वेळी सूर्याची शेंदरी किरणं अंगणात येतात. नारळाच्या झाडावर कुठूनतरी दोन कणेर पक्षी रोज येउन बसतात. छानसा वारासुद्धा अंगणात एकटाच खेळत असल्यासारखा वाटतो. हे सगळं पाहून काहीच बोलावसं वाटणार नाही असं होणार थोडीच!

                                      मला पक्कं माहित आहे अण्णा सगळ्यांशी- आमच्याशी, त्या गायी-बैलांशी पक्षांशी सूर्याशी झाडांशी वाऱ्याशीसुद्धा भरपूर बोलत असणार पण मनातल्या मनात. त्यांच्या मनात सगळ्या गोष्टी-बिष्टींचा मोठ्ठाला खजिनाच तयार झालेला असणार. पण अण्णा म्हणजे त्या खजिन्याची गुहा असलेल्या डोंगरासारखे. सगळा खजिना आत असला तरी बाहेरून एकदम गप्प. पक्के नंबर एक.

                                      आमच्या वाडीतलं मारुतीदादाचं दुकान काही एक नंबर नाही. म्हणजे ते आहे चांगलं. त्यातले चिक्की, बर्फी, आलेपाक, लॉलीपॉप, नल्ली, शेंगदाणे, वाटाणे-चणे, तिखट भडंग वगैरे असलं सगळं कुल्याप्पा म्हणतो तसं "एक लंबर" असतं. पुन्हा सुनील शेट्टीवाली बॉडी असलेला मारुतीदादा आणि दुकानात असताना नेहमी कायतरी खात असणारी नि पटापटा बोलणारी मारुतीदादाची बायको हे पण चांगलेच. मारुतीदादाच्या बायकोला सगळे 'मारुतीदादाची बायको' असंच म्हणणार. लाडातच!
                                      तर असल्या त्या आमच्या वाडीतल्या एकच्या एकच असणारया दुकानात एक चांगली आणि महत्वाची गोष्ट नाहीच. फ्रीज.
                                      त्यामुळे आमच्या एवढ्या जगातल्या सर्वच पोरा-पोरींसाठी अत्यंत आवडीची आणि जीव की प्राण असणारी गोष्ट दुकानात नाही, ती म्हणजे कांडीपेप्सी.
                                     कांडीपेप्सी जर पाहिजे असेल तर मात्र आपल्याला सिंदबाद सारखी एक सफरच करावी लागणार. ती पण सिंदबाद पेक्षाहि साहसयुक्त.

                                      आमच्या वाडीतून पुढे गेलेल्या डांबरी रस्त्याने चालत पुढे निघालं तर मोठ्ठ्या पिंपळाच्या उतारानंतर येतं होळीचं शेत. तिथून एक मोठं वळण घेत घेत पुढे रस्ता जाणार काळ्या आंब्यापाशी. त्याच्यापुढे बामणाचं घर, त्यापुढे पुन्हा उतार मग बालवाडीच्या पुढे पिठाच्या गिरणीपाशी रस्ता वर चढू लागला की त्याच्या टोकावरच बाजूला आहे ते म्हणजे गुरावांचं दुकान. कांडीपेप्सीच्या खजिन्याचं दुकान.
                                     पण हे सगळं पार करून जायचं म्हणजे खायचं काम नाही काही! एकट्याने जायचं तर नावंच नको. दोन भिडू तरी पाहिजेत. पुन्हा चप्पल 'कंपनसरी'.  नाहीतर उन्हाने डांबर इतकं तापलेलं असतं की पाय भाजणारच. एकदम खरपूस. पुढच्या वळणापर्यंत जायला तसं काही नाही. पण वळण संपल्यावरच समोर असणार 'काळा आंबा'. खतरनाक भुतांच्या बापांचा अड्डा!!
                                      तो आंबा यायच्या आधीच त्याच्याकडे न बघता पळत सुटायचं ते डायरेक बामणांचं  घर यायच्या आधी स्टॉप. एकदम स्टॉप. कारण बामणांच्या त्या कंपावणात असणार तीन-तीन कुत्रेसाहेब.  पिक्चरमध्ये बोलतात तसं खूनखार की काय तसले. ते कुत्रे जर कंपावाणाच्या आत असले तर ठीक.  रस्त्यावरनं चूपचाप न पळता पुढे चालत गेलं की काम झालं. पण जर का ते तीन तिघाडे रस्त्यावरच झोपलेले असतील तर मात्र 'सावधान! पुढे धोका आहे'. पेप्सी-बिप्सी विसरून गप उलट फिरायचं आणि त्या साहेब लोकांच्या घशातून अर्रररफफ अर्रररफफ असा आवाज यायच्या आधीच छुमंतर व्हायचं.

                                      एवढे तीन-तीन कुत्रे त्या घरातल्यांनी ठेवलेच कशाला? असं विचारलं कि आज्जी सांगणार, "बामनांच्या घरात रानारे दोघेच. बामन म्हतारा आनी म्हातारी बामनीन. त्यांचं प्वार-बीर सगलं मुम्बैलाच. बामनाचा वाडा म्हंजे लय जुना. त्यात बामनाच्या पनज्यानं माजघराखाली ठेवलाय सोन्याच्या म्होरांचा हंडा. त्या हंड्याव लक्ष ठेवनाऱ्या चोरांची झाली भुतं. ती सगली जमली काल्या आंब्याव आनि लागली बामनाला तरास देयाला. त्येव्वा बामनाने टेटवलीच्या शंकराच्या देवलातल्या पुजारयापासना त्याच्या कुत्रीची तीन पिल्ला आनली. तीच हि तिघव कुत्री. पन त्यांना भ्यायचं नाही.  कुत्रं  म्हनजे दत्तगुरुचं वाहन. त्यांच्या डोल्यातून  दत्तगुरुच आपल्याला पाहत असतात. म्हनून रोज सांजावतीला अंघोली करून शुभं करोति म्हनावी, दत्ताची आरती करावी. मग काय ती कुत्री आपल्याला तरास देयाची नाहीत."
                                      आरती केली की म्हणे कुत्रे भुंकणार नाहीत! कायपण. आज्जी असलं बोलणार नि आम्ही ऐकणार? नावच सोडा.
                                      असलं ते बामणांचं घर. पण ते एकदा ओलांडलं की पुढे काळजीचं काम नाही. सरळ गुरवांचं दुकान. गुरवकाकांनी त्यांचा फ्रीज उघडला की त्यात ऑरेंज, पायनेप्पल, मँगो, जलजीरा, लेमन सगळेच फ्लेवर असणार. त्यांनी पेप्सी आपल्यासमोर धरल्या की त्या पाहूनच आपले डोळे थंड पडणार. मग तो मौल्यवान खजिना घेऊन परत घरी येताना खिशापेक्षा छातीच जास्त भरल्यासारखी वाटते अशा वेळी. कसल्याशा थंडगार ओझ्याने. तुडूंब.




                                                                                               
   
                                                                                             उर्वरित गोष्ट पुढील भागात … 







शुक्रवार, १३ जून, २०१४

२. खजिना : भाग एक

                                   
                                       का अंधारया गुहेतून मी एकटाच चालत होतो. माझ्या हातात मशालसुद्धा नव्हती. ती गुहा जिथे संपणा, तिथे फार मोठा खजिना असणार होता. डंपरने टाकलेल्या रेतीच्या ढिगाऱ्याएवढा, सोने, हिरे, पाचू आणि माणिकयुक्त खजिना! त्या खाजिन्यासाठीच मी एकदम शूरपणे कशालाच न घाबरता गुहेच्या आणखी आत-आत चाललो होतो. हळू-हळू पुसटसा प्रकाश गुहेत दिसू लागला. खजिना आता जवळ आलाच असं वाटून मी आणखीन जोरातच चालू लागलो. अचानक माझ्या डोळ्यांपुढे झगझगीत सोनेरी प्रकाश आला. त्या प्रकाशाने डोळे दिपून जाउन मी ते घट्ट मिटूनच घेतले. आता आपल्याला तो अवाढव्य खजिना दिसणार म्हणून मग मी अलगद डोळे उघडले, तर माझ्या कपाळावर उन्हाचा एक तळहाताएवढ्या आकाराचा कवडसाच पडला होता. समोरच्या खिडकीतून येउन ते कवडसेबुवा सरळच्या सरळ माझ्या कपाळावरच बसले होते.

लाडातच !

                                      मला ते एकदम छानच वाटायला लागलं. कवडसेबुवांमुळे कपाळावर गरमागरम गुद गुलीच व्हायला लागली. सूर्यमहाराज माझ्यावर प्रसन्न की काय ते होऊन आशीर्वादच देत असणार. नक्कीच! खरंतर आणखीन भरपूर वेळ मला असंच अंथरुणात झोपून रहायचं होतं. पण लांबूनच मला आज्जीचा आवाज ऐकू येऊ लागला. कुणाशिकी बोलत ती घरीच येत होती. घरी येउन तिचा रेडीओ सुरु होण्यापूर्वी उठणं आता गरजेचं होतं.
                                       अंगणातल्या कट्ट्यावर येउन बसल्यामुळे बरं वाटू लागलं. सगळीकडे कसं झगमगीत उन पडलं होतं. रोजच्या रोज सकाळी उठून असल्या सोनेरी उन्हात बसल्यामुळे लवकरच आपलं अंग संपूर्ण सोनेरी सोनेरी होणार; एकदम सोनेरी राजपुत्रच! मग आपण एखाद्या सोनेरी केसांच्या राजकन्येला दुष्ट जादुगाराच्या तावडीतून सोडविण्यासाठी घोडयावर वगैरे बसून जाऊ असंच वाटायला लागलं.  पण तितक्यात अचानक डोक्यावर भला मोठ्ठा चंदेरी मुकुट घातलेला एक दुष्ट जादुगार अंगणात, माझ्या पुढ्यात येउन उभा राहिला.

"तुझ्या आत्यास काई कळत नाई ते नाई, तू पन तसलाच! दुपारच्या गाडीनं जायचं तर बा लवकर उठीन,  अंघोळी करीन, चाफ्याची चार फुला तोडून आनीन, ते काई नाई निसतं तंगड्या वर करून झोपायचं. आनिसारा पोरगा असता तर" …….
                                      आज्जीच्या बोलण्याने माझं डोकंच तापू लागलं. कानातून वाफ-बिफ निघाल्यासारखं सुद्धा वाटलं. शेवटी गरम वाफ सोडण्यासाठी कुकर शिट्टी वाजवतो की नाही, तसंच मी घट्ट आळस देत ओरडलो, "कूऊऊऊउक SSSS.... "
                                      शिट्टी वाजवून झालेल्या कुकरसारखं मोकळं मोकळंच वाटायला लागलं मला. पण मी पाहिलं, आजी डोक्यावरची कळशी दरवाज्याजवळ उतरून ठेऊन पुन्हा माझ्याकडेच यायला निघाली होती. दुश्मन हमला करायच्या आधीच गनिमी कावा करून पळणं गरजेचं होतं.

"हरSS हराSSS महादेवSSSS..."

                                     मी कट्ट्यावरून उडी टाकून मागल्या परसात पळालो. तिथून गुपचूप स्वयंपाक खोलीच्या दरवाज्याने आत शिरून, चुलीजवळ जाउन बसलो. एकदम सहीसलामत आणि सुखरूप. बादशहा आज्जीच्या हातावर तुरी कि काय ते देऊन.

                                      घरामध्ये आज सगळ्यांची घाईच-घाई उडाली होती. नानीची पाट्यावर चटणी वाटायची घाई, नानाची लाकडी पेटीत आंबे भरायची घाई, नंदी आत्याची बॅगेत कपडे भरायची घाई आणि आज्जीची? सगळ्यांना बोलायची घाई! बाकीच्या तीन जणांना मात्र कसलीच घाई नव्हती. मला, टोपलीपाठी लपून राहिल्या मनीला आणि बाहेरच्या पडवीत खुर्चीत बसून राहिलेल्या अण्णांना.

                                      तसं  तर आमच्या अण्णांना कधीच घाई नसते. ते माझघरातल्या त्यांच्या कॉटवर किंवा बाहेरच्या पडवीत ठेवलेल्या त्यांच्या खास खुर्चीत बसूनच असतात. त्यांच्यासोबत नेहमी ती त्यांची खासम खास काठी असते. पण अण्णांना काठीने टेकूनसुद्धा चालता येत नाही. ते बसूनच सरकत-सरकत त्यांच्या कॉटपाशी येतात. तिथं असलेल्या माझघराच्या मधल्या खांबाला पकडून उभे राहताना त्यांचे पाय थरथरत असतात. खांबाला धरलेला हात सोडून ते पटकन पडल्यासारखे कॉटवर बसतात. ते सगळं रोज पाहताना माझ्या लक्षात येऊ लागलं की नक्कीच त्यांचे पाय जाम दुखत असणार. त्यांना खूप वर्षांपुर्वी लकवा मारला होता असं पप्पांनी मला एकदा सांगितलेलं. मला काय तेव्हा ते नीट कळालंच नव्हतं. कुणीतरी लकवा नावाचा एखादा प्राणी-बिणी असणार आणि त्याला काठीने मारल्यामुळे देवाने अण्णांना शिक्षा केली असणार असंच मला वाटत होतं. पण लकवा म्हणजे की नाही एक बरा न होणारा आजार असतो. त्याच्यामुळे आपल्या पायातली शक्तीच जाते आपल्याला चालता-फिरता येत नाही. साधं उभं पण रहायला जमत नाही!
नानाकडून असलं सगळं ऐकल्यावर खरं तर मलाच माझ्या पायातून शक्ती निघून गेल्यासारखं वाटलं. अण्णांसाठी मला खुपच्या खूपच वाईट वाटलं; रडूसुद्धा आलं. का, कुणास ठाऊक? पण आलं.


                                      तेव्हापासून मग मला अण्णांची भीती वाटायचीच बंद झाली. मी त्यांच्या कॉटजवळ जाउन बसू लागलो. अण्णा काय आणू मी? असं त्यांना विचारू लागलो. त्यांच्या पानाच्या ताटात पान-सुपारी वगैरे आहे की नाही, ते पाहू लागलो. नसली तर नानीकडनं घेऊन ठेऊ लागलो. ते मशेरी लावत असतील तर त्यांना कोमट पाण्याने भरलेला तांब्या नेउन देऊ लागलो. अण्णांसाठी आपण सतत काहीना काहीतरी आणत राहिलं पाहिजे असंच वाटायचं मला.

                                      मी जवळ गेलो कि अण्णा माझ्या पाठीवरून हात फिरवतात. त्यांच्या त्या सफेद केसांच्या दाढीमधून हसतात. "अऎ शाब्बास! छान छान", असं म्हणतात. पण तेवढंच. त्यानंतर मग ते असेच समोरच्या भिंतीकडे टक लावून बघत बसतात. पुढे काही बोलतंच नाहीत. का पण ?

                                      हळू-हळू माझ्या लक्षात येऊ लागलं की आमच्या घरातलं कुणी कुण्णीच अण्णांशी बोलत नाही. म्हणजे घरी आल्यावर सगळे त्यांना हाक मारतात, जेवताना, झोपताना आणि बाकीच्या वेळी त्याना काय हवं, काय नको, ते विचारतात सुद्धा. पण त्यांच्याजवळ नीटपैकी बसून, आज काय-काय झालं,  काय-काय केलं, याचं काय झालं, त्याचं काय झालं, असलं जे काही नाना नानी किंवा आत्या आज्जीचं चालू असतं तसं अण्णांशी कुणीच बोलत नाही. फक्त एक माणूस सोडून.

                                      सुट्टीत पप्पा जर केव्हा गावी आले तर ते मात्र अण्णांशी जाम बोलणार. सारखे त्यांच्याजवळ बसून राहणार. त्यांना स्वतःबद्दल किंवा माझ्याबद्दल काय नि काय सांगत बसणार. शिवाय आणि पप्पा लहान असताना ते अण्णांना कसे घाबरायचे, अण्णा कसे खूप कडक शिस्तीचे होते, ते पप्पांना आणि काकांना कसे बेदम मारायचे, मग अण्णांचे बाबा - म्हणजे पप्पांचे आजोबा पप्पांचे किती लाड करायचे,  त्यांना खाऊसाठी भरपूर पैसे द्यायचे, त्याच्या सगळ्या गोष्टी-बिष्टी तर पप्पा सारखेच सांगणार. पण त्या गोष्टी कितीही वेळा परत-परत ऐकल्या तरी मला कंटाळा येतच नाही. पप्पानी आणखी हजार वेळा जरी त्या गोष्टी सांगितल्या तरी तेवढयाच हज्जार वेळा मी त्या गोष्टी ऐकणारच!
                                      पप्पांचं पाहून मीसुद्धा जेवायला अण्णांच्या बाजूला बसतो. अण्णा जेवायला बसणार एकदम ताठ. मी पण त्यांच्यासारखा ताठच बसणार. पण आमची भाकरी खाऊन होईपर्यंत आमचे पाठचे पाठोबा थकतात आणि पुढचे पोटोबा आणखी पुढे येतात.
                                      आमचं नेहमी असंच. आई म्हणते तसं, "आधीच हौस, त्यात पडला पौस!"






                                                                                                       उर्वरित गोष्ट पुढच्या भागात… 

















सोमवार, २ जून, २०१४

१. सोनेरी लाटांची गोष्ट : भाग चार

                                 
                                       'विरार सार्वजनिक वाचनालय व  ग्रंथालय' असं एका पाटीवर लिहिलं होतं. त्या पाटी खालीच एक दरवाजा होता. तो उघडाच होता. त्या दरवाजाच्या आत कुणीतरी येडपटासारखा भरपूर अंधार करून ठेवला होता. एका टेबलाच्या पाठी एक चश्मिष काका आणि चाश्मिष काकी एकदम गप्प बसले होते. त्यांच्यापुढयात टेबलावर कितीतरी रंगीबेरंगी चित्रांची पुस्तकं, आमच्या वर्गातल्या हजेरीपटासारख्या मोठ्ठाल्या जाडजूड वह्या, पेनं, स्केचपेनं, गमाची निळी डबी, शाईचा पॅड आणि कसले कसले शाईने माखलेले गोल, चौकोनी, आयताकृती शिक्के पडलेले होते. मला त्या टेबलाजवळ थांबायला सांगून पप्पा एका कपाटाजवळ गेले. त्या काचा लावलेल्या कपाटात खूप सारी पुस्तकं कुणीतरी एकदम रांगेतच लावून ठेवली होती. हे त्या गप्प बसून राहिलेल्या चश्मिष  काका-काकींचच काम असणार. मी पाठीमागे वळून त्यांच्याकडे पाहायला गेलो आणि एकदम भ्यायलोच!

ते दोघं सरळ सरळ माझ्याकडेच पाहत होते!!

आणि ते अजुनी हसत नव्हते!!!

त्या काकांनी तर त्यांच्या भुवयाच उडवायला सुरुवात केली.
                                   
                                      काय रे पोरा? नाव काय तुझं? इथे काय करतोयस? असा का पाहतोयस? ठेऊ का तुला  कपाटात नेउन? प्रत्येक वेळी भुवई उडवताना ते काका असलंच कायतरी विचारत असणार, असं वाटून माझ्या पोटात जोरात दुखू लागलं. म्हणून मग मी हाताची घडी घालून त्या मॅडकॅप काका-काकींकडे न बघता पुस्तकांच्या कपाटांकडे बघू लागलो. एक, दोन, तीन, चार. एका रांगेत चार आणि एकूण रांगा पाच, म्हणजे चार पंचे वीस. पुन्हा त्या काका-काकींच्या पाठीमागे एक-एक. एकूण बावीस कपाटं! बाप्पा!

"अय्या तू SSS"
                                     मी गर्रकन मान वळवून दरवाजापाशी पाहिलं. एक सफेद केस, सफेद मिशा आणि सफेदच कपडे घातलेले हसरे आजोबा उभे होते. पण त्यांनी मला लहान मुलीसारखा आवाज काढून का हाक मारली?

मी त्यांच्याकडे नीटच पाहिलं. त्यांच्या एका हातात पुस्तक होतं आणि दुसरया हातात एका मुलीचा हात. ती मुलगी माझ्या एवढीच होती आणि तिने फिक्कट निळ्या रंगाचा फ्रॉक घातला होता. तिचे डोळे मोठे गोल-गोल होते आणि ती माझ्याकडेच हसत पाहत होती.
प्रांजली!

"आजुबाबा हा नं अक्षय. हा किनई आमच्याच वर्गात आहे. आणि तुम्हाला सांगू, याला किनई आपली सोनेरी लाटांची गम्मत पहायची आहे. तो किनई…. "
                                     मी त्या आजोबांना नमस्कार केला. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेऊन केस विस्कटल्यासारखं केलं. मला मस्तच वाटलं ते. तेवढ्यात कपाटाच्या जंगलात हरवलेले पप्पा एक पुस्तक घेऊन हसत हसत आमच्याजवळ आले. त्यांनी ते पुस्तक आणि खिशातलं एक कार्ड त्या टेबलामागच्या काकांकडे दिलं. ते काका त्यांच्या वहीत काहीतरी लिहू लागले. तोपर्यंत मी प्रांजलीला आणि तिच्या आजुबाबांना, 'हे माझे पप्पा', असं सांगितलं. पप्पांनी त्यांना नमस्कार केला आणि  मग ते त्या आजुबाबांच्या हातातल्या पुस्तकाविषयी काहीतरी बोलू लागले. तोवर प्रांजली आणि मी दरवाजाबाहेर येउन बोलू लागलो. प्रांजलीची गाडी एकदम जोरातच चालू झाली. सोमवारच्या गृहपाठाबद्दल, बाईंनी घरून काढून आणायला सांगितलेल्या प्राण्यांच्या चित्राबद्दल, शनिवारी घरी जाताना रस्त्यात पाय घसरून पडलेल्या गौरीबद्दल, काय काय नि काय काय. पण मधेच तिच्या गाडीला ब्रेक लागला. पप्पा आणि तिचे आजोबा आमच्याजवळ आले.
"आजुबाबा किती उशीर? चला नं लवकर तळ्याजवळ आणि तुम्ही पण चला ना काका, तिथे तळ्याजवळ किनई आमची एक गम्मतच आहे सोनेरी लाटांची."
                                      प्रांजली कुणासमोर बोलायला घाबरतच नाही. नाहीतर आम्ही. आम्हाला लवकर असं कुणाशी बोलायला जमतच नाही.

"सोनेरी लाटांची गम्मत? अरे वा! मग आम्हाला पण पाहिलीच पाहिजे ती एकदा. चला  दाखवा पाहू. आम्ही पण येतो तुमच्यासोबत."
                                      पप्पा प्रांजलीशी बोलताना मला ते एकदम आमच्या वर्गातले असल्यासारखेच  वाटले. मी हळूच पप्पांचा हात हातात घेऊन दाबल्यासारखं केलं. खरं तर मला त्यांच्या गळ्यातच हात टाकण्यासारखं वाटत होतं. म्हणजे आम्ही मित्र-मित्र एकमेकांच्या गळ्यात हात टाकतो ना, तस्सं. पण ते जमणार थोडीच. पप्पा माझ्याकडे पाहून हसत होते. प्रांजली आणि तिचे ते धिप्पाड मिशीवाले आजुबाबाही हसत होते. त्या सगळ्यांना पाहून मी पण हसत होतो. आमच्या बाजूची नगरपालिकेची इमारत, वाचनालयाची ती बुद्धू पाटी, डांबरी रस्ता, त्यावरची अशोकाची झाडं, आजूबाजूची माणसं, वरचं गुलाबी आभाळ, आभाळातले ढग सगळेच हसत होते.

फक्त आतली दोन माणसं सोडून. मॅड कॅप.

                                      आम्ही चालू लागलो. पप्पा आणि प्रांजलीचे आजुबाबा एकत्र चालत होते नि त्यांच्या पुढे प्रांजली आणि मी त्यांच्यासारखेच एकत्र चालत होतो. म्हणजे फक्त मी चालत  होतो. पण प्रांजली? ती चालता-चालता मधेच उडी मारल्यासारखं करत होती. तिचं पाहून मग मी पण लगेच तश्शीच उडी मारायचो. प्रांजलीची गाडी अजुनी चालूच होती. ती मला तिच्या नि आजुबाबांच्या गमती जमती सांगत होती. सांगत होती म्हणजे एकटीच बडबडत  होती. मी मधूनच हू, अरे वा! मज्जाच कि मग! बापरे!! असलं कायतरी बोलत होतो. माझं काय तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. प्रांजलीच्या त्या फिक्कट निळ्या रंगाच्या फ्रॉक वर कुठे कुठे छोटी कापडी सफेद फुलं लावलेली होती. प्रांजली उडया मारत चालताना ती फुलं मस्तपैकी वरखाली हलतडुलत होती. मी त्यांच्याकडेच पाहत चाललो होतो.
                                     चालत-चालत आम्ही रस्त्याच्या कडेला खाली आलो. तिथे खाली छानपैकी छोटं छोटं गावात उगवलेलं होतं. सभोवताली भरपूर नारळाची झाडं होती. मी वर पाहिलं. वरती नारळाच्या झाडांच्या झावळ्याच झावळ्या वाऱ्यानं हलताना दिसत होत्या. त्या झावळ्यांचं एक मस्तपैकी छप्परच वरती तयार झालं होतं. झाडांच्या पुढे लांबच लांब आडव्या दगडी पायरया होत्या. आम्ही त्या पायरयांजवळ गेलो. एकूण चार पायरया दिसत होत्या. पाचवी पायरी तलावाच्या पाण्याखाली दिसत होती. पण तिच्याही खाली आणखीन बरयाच पायरया आहेत, असं प्रांजली म्हणाली. पप्पा आणि आजुबाबा पायरयांजवळ येउन उभे राहिले. ते अजुनी बोलतच होते. मी त्यांच्याकडे पाहत असतानाच प्रांजलीने पटकन माझा हात खेचून मला खाली बसवलं. आम्ही दोघं दुसरया पायरीवर बसलो होतो.
"आता गुपचूप समोर बघत बसायचं."
                                     असं बोलून प्रांजली खरोखरीच गप्प बसून समोर पाहू लागली. मघापासून सुरु असलेली तिची गाडी अशी अचानक बंदच पडल्याने मला सगळं खूपच शांत शांत वाटू लागलं. मी वरती पाहिलं. ते नारळाच्या झाडांचं छप्पर इथेही थोडं बाहेर आल्यासारखं होतं. खाली तलावाच्या पाण्यात पाहिलं तर मला ते छप्पर, त्याखाली गप्प समोर बघत बसलेली प्रांजली आणि येडपटासारखं स्वतः कडे पाहणारा मी दिसलो. मी माझ्या भुवया उडवून पाहिल्या. केस विस्कटलेले ते जरा नीट केले. तेवढयात तलावाच्या पाण्यावर कसलासा प्रकाश पडल्यासारखं झालं. मी समोर पाहिलं आणि पाहतच राहिलो.


                                      समोर आकाशात थोडे वरती-थोडे खालती असे लालेलाल झालेले सूर्यमहाराज होते. त्यांची तांबूस नारंगी किरणं पडून तळ्याचं पाणीसुद्धा लालेलाल सोनेरी दिसत होतं. कुठूनतरी थोडासा वारा वाहत होता आणि त्या वारयामुळे तलावाच्या पाण्यावर छोट्या छोट्या लाटा उमटल्या होत्या. त्या लाटांवर तलावाचं सोनेरी पाणी हलत होतं.

सोनेरी लाटा!

                                     मी डोळे विस्फारून कि काय म्हणतात, तसं ते गप्प पाहत होतो. पप्पा आणि प्रांजलीच्या आजुबाबांचाही आता आवाज येत नव्हता. मी हळूच मान वळवून त्यांच्याकडे पाहिलं तर तेसुद्धा शांतपणे त्याच सोनेरी लाटा पाहत होते.

मी पुन्हा मान सरळ करून त्या लाटांकडे पाहू लागलो. माझ्या हातावर एक चापटीच पडली. मी प्रांजलीकडे पाहिलं तर ती खोडकरपणे हसत माझ्याकडेच पाहत होती. मग मीसुद्धा तिच्या हातावर एक चापटी मारून फिट्टमफाट केलं. आम्ही दोघं पण हसत होतो. आता आमच्या सभोवती फक्त सोनेरी लाटाच आहेत आणि त्यांच्यामध्ये फक्त नि फक्त आम्ही दोघच मॅडसारखे हसत बसलो आहोत असंच वाटत होतं मला .











                                           ________*** समाप्त ***________

कशी वाटली गोष्ट?

गुरुवार, २९ मे, २०१४

१. सोनेरी लाटांची गोष्ट : भाग तीन

                                      सोनेरी लाटांची गोष्ट प्रांजलीकडून ऐकल्यापासून मला काय चैनच पडत नव्हती. कधी एकदा त्या लाटा पाहायला मिळतायत असं झालेलं. पण आमची शाळा दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजून तीस मिनीटांपर्यंत. पळत पळत घरी यायचं म्हटलं तरी सहा वाजणारच. तोपर्यंत सूर्यबुवा त्या लांबच लांब दिसणाऱ्या झाडांच्या रेषेपाठी बुडायच्या अगदी तयारीतच असणार. मग त्या बाजारातल्या टोटाळे तलावावर जायचं तरी कधी आणि कुणासोबत? शनिवारी आमची सकाळची शाळा असते आणि रविवारी तर सुट्टीच, म्हणजे त्या दिवशी हे जमण्यासारखं असतं की नाही? पण ते जमायचं नावच नाही. कारण आई-पप्पा अगोदरच सुट्टीचं गुपित ठरवून ठेवणार आणि मला मात्र सांगणार नाहीत. शनिवारी दुपारी मी शाळेतून घरी आलो की जेऊन लगेच आई नवीन कपडे घालायला देणार. मग कितीही रडलं, आपटाआपट केली तरी फायदा नाही. उलट मारच पडणार. बाहेर पळून गेलं तरी आई आपल्याला शोधत खाली येणार. मग आपण जिकडे खेळत असणार तिथून घरापर्यंत आपली वरातच!
                                      नवीन कपडे घालून आईसोबत रिक्षात बसायचं. स्टेशनला उतरून पुन्हा त्या भंगार ट्रेनमध्ये बसायचं. दादर स्टेशन कधी येतं ते आपल्याला कळतच नाही. कारण तोपर्यंत आपण आईच्या मांडीवर मस्तपैकी झोपलेले. दादर स्टेशनवर आम्ही पोरं 'डोंगराला आग लागली पळा पळा' खेळताना जशी पळतो की नाही तश्शीच मोठी माणसं पळत असतात. अशावेळी मला मोठ्ठयाने ओरडून त्यांना स्टॅचू करावसं वाटतं. एक-दोन-तीन, स्टॅचू SSS! सगळी माणसं स्टॅचू होतील. आईसुद्धा. मग आपण लगेच ट्रेनमध्ये बसून पुन्हा विरारला जाऊ आणि तिथून जोरात ओरडू ओ-व्ह-र SSS. एक-दोन वेळा मी स्टॅचू म्हणालेलो सुद्धा, पण फ़ुस्स्स्स! कुणी थांबलंच नाही.

                                      दादरला गेल्यावर मोठमोठी काचेची दुकानं, डब्बलडेकर बसगाड्या, भारीभारीतल्या रंगीबेरंगी गाड्या रस्त्यावर दिसणार. तेव्हा मग सोनेरी लाटा आमच्या डोक्यातून पार उडूनच जाणार. वरळीला मामाकडे गेल्यार तिथले मित्र, नवनवीन खेळ, व्हिडीओ गेम, रंगीत टि.व्ही.वरचं कार्टून इतकंच नाही तर रात्री दादाबरोबर फिरायला सी फेस वर! सी फेस म्हणजे की नाही एक मोठ्ठाच्या मोठ्ठाला समुद्र. त्या समुद्राच्या किनारी लांबच्या लांब दगडी कट्टा आहे. त्या कट्ट्याजवळ खूप लोक रात्री फिरायला येत असतात. तिथे कुल्फीवाले, चणे-शेंगदाणेवाले, काकडीवाले, मकावाले हे तर असणारच. आपण मस्तपैकी कुल्फी घ्यायची आणि दगडी कट्ट्यावर जाउन बसायचं. पाठीमागे एकदम लांबच्या लांब गेलेला, पिवळ्या दिव्यांनी झगमगलेला रस्ता आणि पुढे आपल्यासमोर समुद्राच्या लाटा. सफेद सफेद फेसाच्या लाटा समुद्रात सारख्या येतच असतात. त्या कधी थांबतच का नाहीत कुणास ठाऊक? पण त्या लाटांचा खूप मस्त आवाज येतो. तो ऐकताना कुणीतरी कानाशी गुदगुल्याच करत असल्यासारखं वाटतं. फिरून पुन्हा घरी येउन आपण झोपलो तरी सुद्धा तो आवाज आपल्या कानाशी वाजत असतो.
                                      रविवारी रात्री उशिरा आपण विरार स्टेशनला उतरून, रिक्षात आई-पप्पांच्या मध्ये बसून घरी कधी येतो ते आपल्याला कळणारच नाही. आपण एकदम ढाराढूर ते पंढरपूरच! सकाळी उठलं की राहिलेला अभ्यास करून, जेऊन पुन्हा आम्ही आमच्या शाळेत. मग वर्गात प्रांजलीला पाहिलं की तिच्या डोळ्यात आपल्याला त्या सोनेरी लाटा दिसू लागणार. कारण प्रांजली कालच्या संध्याकाळी तिच्या आजुबाबांसोबत तलावाच्या त्या दगडी पायरयांवर बसून सोनेरी लाटा पाहून आली असणारच! मग काय? मधल्या सुट्टीत कालच्या सोनेरी लाटांची आणखीन एक नवीन गोष्ट!

                                     एके दिवशी शनिवारी दुपारी मी शाळेतून घरी आलो. हात-पाय-तोंड धुवून जेवायला बसलो, जेऊन सुद्धा झालं. तरी आईने,"आज आपल्याला मामाकडे किंवा आणखी कुणाकडे तरी जायचं आहे", असलं काही मला सांगितलंच नाही. त्यादिवशी मी खूप खेळलो. त्याच्या दुसरया दिवशी पप्पांसोबत बाजारातही जाउन आलो. आणि दुपारी जेऊन पुन्हा खेळायला पळालो.
                                     संध्याकाळी मात्र पप्पा मला घेऊन बाजारात निघाले. पाच-सव्वा पाच वाजले असतील. मला काय तेव्हा बाजारात जायचं नव्हतं. कारण दुपारपासून आमच्या लपाछुपीच्या खेळाला भरपूर मज्जाच येत होती. आम्ही दहा-बारा पोरं पोरी मिळून लपाछपी खेळत होतो. त्यात आज माझ्यावर राज्य येत नव्हतं त्यामुळे चांगलंच वाटत होतं. एवढे जण लपाछुपी खेळत असताना ज्या पोरावर राज्य येईल ते पोरगं रडणारच. कारण मग सगळे त्याला फसवणार. चिडाचिडी करणार. अंधार पडेपर्यंत काही त्या पोरावरचं राज्य जायचं नाव नाही. पुढे दोन-तीन दिवस तरी ते पोरगं लपाछुपी खेळायला येणार नाही. पण तोपर्यंत दुसरा कुणीतरी बकरा होणार. आजचा बकरा आमच्या चाळीपुढचा पिंट्या होता. आपलं राज्य घालवण्यासाठी तो धावतच सगळ्यांना शोधायचा आणि पटापट थप्पे करायचा. पण तरीसुद्धा शेवटी कुणीतरी भोज्ज्या करतच होतं. पिंट्या लवकरच रडकुंडीला येणार होता. मी आणि परशा एकत्रच इथं-तिथं लपत होतो आणि पाच-सहा थप्पे झाले की मुद्दामच बाहेर पळत येउन आउट होत होतो. येऊ दे कुणावर पण राज्य, आम्हाला काय? असेच आम्ही दोघं बैलगाडी पाठी लपलो होतो. अचानक माझ्या शर्टाची कॉलर जोरात खेचली गेली. मी आपोआप उभाच राहिलो. कुणीतरी मला खेचून उठवलं होतं. मी मान वळवून मागे पाहिलं तर मला आमच्या नंदिआत्याचा ड्रेस दिसला. वर पाहिलं तर नंदिआत्याच होती ती. मोठमोठ्यानं काहीतरी बोलत होती. मला काय ते ऐकायचंच नव्हतं. मी तिच्या हातातून निसटून जायला पाहत होतो पण शेवटी ती मला खेचत-खेचत घराकडे निघाली. मी आत्याच्या पाठीवर खूप चिमटे काढून पाहिले. उड्या मारमारून बुक्के सुद्धा मारले. पण मी काही सुटलो नाही. उलट तिने मला धपाटे घातले ते वेगळंच. मीSS नाहीSSजाणारSS, मीSS नाहीजाSS णारSS, मीनाSS हिजाणारSS, मीनाSS नाहीSS जाणारSS. जिना चढताना मी असलं भजनच सुरु केलेलं. पण पुढे तसाच भजन करत करत मी घराच्या दरवाजापर्यंत गेलो आणि एकदम शांतपणे डायरेक्ट मोरीत जाउन पायावर पाणी ओतू लागलो. कारण आमचं भजन आम्ही घरात पोहोचायच्या अगोदरच चहा पीत बसलेल्या पप्पा आणि आईच्या कानावर जाउन पोहोचलं होतं. त्यामुळे मी दरवाजात जाउन उभा राहिलो तेव्हा आई-पप्पांचे डोळे एवढे मोठ्ठाले आणि लालभडक झाले होते की पहिल्याने कोण मारणार, हे त्यांचं ठरायच्या आधीच माझी चड्डी ओली झाली असती!

                                     रिक्षाने आम्ही थेट बाजारातल्या नगरपालिकेच्या इमारतीपाशी आलो आणि माझ्या डोळ्यात लख्ख कि कसा तो प्रकाश पडला. रश्मीबाई म्हणतात तेच बरोबर. आमच्या डोक्यातली टयूबलाइट लवकर कधी पेटणारच नाही. शेजारच्या नरवणे काकांच्या घरातल्या टयूबलाइट सारखी बटण दाबलं की अगोदर झिक-चिक झिक-चिक करणार आणि तिचं स्टारटर कि काय ते फिरवलं की मग ती प्रकाश देणार. रिक्षातून उतरल्यावर असाच कुणीतरी माझ्या डोक्याच्या ट्युबचा स्टारटर फिरवला असणार, असं मला वाटू लागलं.
                                      संध्याकाळ होती. पश्चिम दिशेला सूर्य महाराज बरयापैकी वर होते आणि नगरपालिकेच्या इमारतीपाठी टोटाळे तलाव होता. माझ्या डोळ्यांपुढे प्रांजलीच्या डोळ्यातल्या सोनेरी लाटा चमकु लागल्या.




                                                                   
                                                                                 उर्वरित गोष्ट पुढच्या आणि शेवटच्या भागात… 




बुधवार, २१ मे, २०१४

१.सोनेरी लाटांची गोष्ट : भाग दोन

                                       
                                        मला टोटाळे तलाव पाहायला मिळतं, ते म्हणजे बाजारात गेल्यावर. रविवारी पप्पांसोबत बाजारात जायचं म्हणजे एक मज्जाच असते. पण आईसोबत बाजारात जायचं म्हटलं तर काही मज्जा नाही. उलट शिक्षाच! कारण आई म्हणजे पण ना आईच आहे. एक तर ती बाजारात गेल्यावर भाजी घेऊन बसलेल्या प्रत्येक बाईकडे जाणार. अशा भाजीवाल्यांच्या टोपल्यांपुढे, फळ्वाल्यांच्या गाडीभोवती आणि कांदे-बटाटेवाल्यांच्या दुकानांपुढे आईसारख्याच  खूप साऱ्या बायकांचा घोळका असतो. अशा ठिकाणी आई खूप वेळ लावते. शिवाय त्या बाकीच्या बुद्धू बायका आपल्याला पुढचं  काही पाहूनच देत नाहीत. मच्छीमार्केट मध्ये सुद्धा आईसोबत जबरदस्ती जावं  लागतं. मच्छीच्या वासाने मला ओकारीसारखं होतं, हे आईला चांगलंच ठाऊक आहे. तरीसुद्धा ती मला हात धरून आत नेणारच. पुन्हा आत सगळीकडे फिरून फिरून शेवटी पहिल्याच मच्छिवालीकडून मच्छी घेणार. आणि आई खाऊ घेणार म्हणजे एकच-वडापाव किवा चुरमुरयाची भेळ.

संपलं.
                                     
                                       शिवाय घरी येताना माझ्या सुद्धा हातात एक-दोन जड पिशव्या देणार आणि रिक्षाने न आणता चालतच घरी आणणार. म्हणूनच आईसोबत बाजारात जायचं म्हणजे कंटाळा गुणिले कंटाळा. पण पप्पांसोबत बाजारात जायचं म्हणजे चांगली संधीचा समानार्थी शब्दच. पर्वणी!
                                        पप्पांच्या हातात हात घालून आपण उड्या मारत बिंदास चालत राहायचं. पप्पा ओरडणार तर नाहीच, उलट त्यांच्या ऑफिसमधल्या गमती-जमती सांगत बसणार. माझ्या शाळेबद्दल, वर्गातल्या मित्रांबद्दल मला विचारणार. बाजारात पोहोचल्यावर मुळीच टाईम लावणार नाहीत. कांदे-बटाटे एकदम पटापट घेणार. भाजी तर माझ्या आवडीचीच घेणार. शापु, मेथी, तोंडली, असलं काही घेणार नाहीत. मच्छीमार्केट मध्ये तर पप्पा मला नेतच नाहीत. समोरच्या हॉटेल मध्ये बसवून, मँगोला किवा थम्स-अप घेऊन देतात. आणि आपण ते पिउन संपायच्या आतच पप्पा मार्केटमधून मच्छी घेऊन येउन पुन्हा आपल्यासमोर उभे! एकदम फाष्ट्च! पण खरी मज्जा त्यानंतर येते. टोटाळे तलावाच्या बाजुलाच रस्त्याशेजारी 'महाराष्ट्र किराणा माल' हे दुकान आहे. त्या दुकानात लोकांची खुपच गर्दी असते. तिथे गेल्यावर पप्पा मला दुकानाच्या बाजूला असलेयला पायरयांवर सावलीत बसवून ठेवतात. तिथून समोरच टोटाळे तलाव दिसतं. मी मग त्याच्याकडे भरपुर वेळ पाहत बसतो. दुपारच्या उन्हात ते तलाव उघडं  पडल्यासारखं वाटतं. ओणवं उभं  राहायची शिक्षा दिलेल्या मुलासारखं बिच्चारं वाटतं. आमच्या शाळेपुढच्या तलावासारखंच हे तलाव सुद्धा चौकोनी आहे. पण खूप मोठं. ते खूप खोलही आहे, असं पप्पा सांगतात. इतकं की पप्पांच्या डोक्यावर आणखी चार माणसं एकावर एक उभी राहिली तरी सर्वात वरच्या माणसाच्या नाकापर्यंत पाणी येईल. तलावाच्या ज्या चौथ्या बाजुला बाजार भरत नाही, तिथे बऱ्यापैकी सावली आहे. नारळाची छानशी झाडं  आहेत. तलावात उतरणाऱ्या लांबच्या लांब दगडी पायऱ्या सुद्धा आहेत. त्या बाजूला जायला मला कधीच मिळालं नव्हतं.

                                        आमच्या शाळेजवळच्या छोट्या तलावात कधी कधी तीन-चार काळीकुट्टं माणसं,  डोक्यावर मोठ्ठाल्या टोपल्या घेऊन येतात. त्या टोपल्यांमध्ये पालेभाजी आणि मूळ्याची भाजी असते. ते लोक ती भाजी तलावाच्या पाण्याने धुतात. त्यानंतर त्याच पाण्याने अंघोळ करतात आणि शेवटी कपडे पण तिथेच धुतात. त्यावेळी तलावाच्या पाण्यावर मस्तपैकी छोट्या छोट्या लाटा तयार होतात. फेसमहाराज त्या लाटांवरून डुलत डुलत ऐटीत तलावाच्या दुसऱ्या काठापर्यंत जातात. कधी कधी खूप साऱ्या  काळ्याकुट्टं म्हशींची टीम तलावाच्या पाण्यात उतरते. त्या म्हशी बुद्धुसारख्या पाण्यात बसूनच राहतात. आम्हाला  गेल्याच महिन्यात  सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातला जलप्रदूषणाचा धडा बाईंनी शिकवला. त्यामुळे तलावाचं  पाणी प्रदूषणयुक्तच  असणार, हे आम्हाला चांगलंच  माहित होतं. पण दरवर्षी तलावात गणपती विसर्जन होतं. आणि विसर्जन झाल्यावर तलावाचं पाणी पुन्हा शुद्ध होतं, असं आमच्या वर्गातली किर्ती किणी सगळ्यांना सांगत असते. किर्ती म्हणजे काय दरवर्षी पैकीच्या पैकी मार्क.  'चिव चिव तेजश्री' नंतर दुसरा-तिसरा तरी नंबर तिचा असणारच. त्यामुळे तिचं बोलणं काय खोटं नसणार, असं बाली मला नेहमीच  सांगतो. पण तरीसुद्धा आमच्या तलावात पाण्याखाली खूप भुतं-बितं असल्याचं आई आणि आत्या मला नेहमी सांगत असते. तलावात दरवर्षी एक-दोन  माणसं तरी बुडून मरतात. मग त्या मेलेल्या माणसांची भुतं होतात. ती भुतं खोल पाण्याखाली लपून बसलेली असतात. आपण तलावाच्या काठाशी एकदम जवळ गेलो, तर ती पटकन आपल्याला खेचून पाण्याखाली नेतात आणि बुडवून मारून टाकतात? नंदीआत्यानं झोपताना असलं काही सांगितलं की आम्ही गारच! मग गोधडी अंगावर घेतली की गुदमरायलाच व्हायला पाहिजे. आपण तलावाच्या हिरव्या-काळ्या पाण्याखाली बुडत चाललोय असंच वाटत राहणार आणि सकाळी उठून पाहिलं की खरोखरंच गोधडी ओली!

                                     
                                        आमच्या तलावाच्या अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण टोटाळे तलावाच्या अशा काहीच गोष्टी मला माहित नव्हत्या. शंतनू, धीरज, जितेश पवार, विश्वास परुळेकर, प्रथमेश खानोलकर, दिपिंती सकपाळ, मधुरा आणि बरीचशी मुलं-मुली पूर्वेला राहतात. पण त्यांच्यापैकी कुणालाही त्या तलावाबद्दल विचारलं की, " त्यात काय एवढं? आहे मोठ्ठ तळं. त्यात नुसतं पाणीच पाणी. काय करायचं एवढ्या पाण्याचं? ", अशा मुली बोलणार. आणि मुलाचं नेहमी एकच ठरलेलं, " ते तलाव काय कामाचं नाही. उगाचच आहे मधल्या मध्ये. त्यापेक्षा त्या जागेवर एखादं मैदान असतं तर खेळायला-बिळायला तरी झालं असतं. बेकार तलाव. "
                                       हि मुलं -मुली मला चक्रमच वाटतात. चांगलं एवढं मोठ्ठालं तलाव आहे तरी यांना त्याचं काहीच नाही. आमच्या पश्चिमेला एकच तलाव, ते पण छोटं. तरीसुद्धा आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. तलाव आमची शानच आहे. पण या पुर्वेकड्च्यांना त्यांच्या एवढ्या मोठ्ठ्या तलावाचं काहीच वाटत नाही. फक्त प्रांजली सोडून. कारण प्रांजलीला तलाव खूप आवडतो. मी कधी तिला तलावाबद्दल विचारलं, की ती पहिले दोन्ही हात तोंडावर ठेवून खो-खो हसते. तिला तसं हसताना पाहून मग मला पण वेड्यासारखं हसायला येतं. प्रांजलीसोबत बोलताना कुणीही तिच्या डोळ्यांकडेच पाहत बसणार. तिचे डोळे खूप मोठ्ठे आहेत आणि ते तलावाच्या पाण्यानेच भरल्यासारखे वाटतात.
                                   
                                     " आमचं तलाव किनई खुपच्या खूपच छान आहे. एकदम शहाण्या बाळासारखं शांत. पावसाळ्यात किनई ते एकदम काठोकाठ भरतं. आणि तुला सांगू कधी-कधी त्यात किनई पाणबगळे आणि पाण कोंबड्या सुद्धा येतात. ते उडता उडता  किनई पटकनशी पाण्यात बुडी मारतात. आपल्याला वाटतं की बाई बुडालेच ते! पण तसं नसतं काही! ती त्यांची किनई एक गम्मतच असते. मग ते गपकन पाण्याबाहेर येतात आणि तुला सांगू त्यावेळी त्यांच्या चोचीत किनई एक चंदेरी मासा असतो. ते त्याला तसेच खातात आणि पाण्यावर किनई बोटीसारखे तरंगत राहतात. आणि तुला सांगू पौर्णिमेच्या रात्री किनई चंद्र तलावाच्या पाण्यात उतरतो. त्याला पाहून नमस्कार केला, की पाठ केलेलं सगळं लक्षात राहतं असे माझे आजुबाबा सांगतात. आणि तुला सांगु सर्वात जास्त मज्जा किनई संध्याकाळी असते. तेव्हा लालेलाल सूर्य किनई हळू-हळूच पश्चिम दिशेला उतरत असतो. तेव्हा आपण तलावाच्या दगडी पायऱ्या आहेत किनई तिकडे जाऊन बसायचं. मग सूर्यदेव बरोब्बर आपल्या समोर! तेव्हा  किनई एक मोठी जादूच होते! तलावाच्या पाण्यावर वाऱ्यामुळे किनई छोटया छोटया लाटा पळत असतात. आणि तुला सांगू सूर्याची सोनेरी सोनेरी किरणं त्या लाटांवर पडतात आणि मग तलावाचं सगळं पाणीच सोनेरी सोनेरी दिसतं. त्या सोनेरी लाटा पाहायला आमचे आजुबाबा किनई मला दर शनिवारी आणि रविवारी त्या दगडी पायऱ्यांजवळ नेतात आणि तुला सांगू……  "

                                      प्रांजली सोबत बोलायचं म्हणजे मधली सुट्टी छोटीच वाटणार. तिचं बोलणं म्हणजे त्या रेल्वेच्या रुळांसारखंच. स्टेशन मधून निघाले की बेटे गेलेच लांबच्या लांब. कुठे संपायचं नावच  नाही. पण तरीसुद्धा मला प्रांजलीचं बोलणं खूप मस्त वाटतं. त्यात ती 'किनई' हा शब्द तर भरपूरच वेळा बोलते. प्रत्येक वाक्यामध्ये एकदा तरी किनई असणारच. वर्गातली मुलं -मुली सुद्धा तिला 'किनई'च बोलतात. " अगं किनई,  आम्ही सगळ्या किनई कधीच्या डबा उघडून बसलोय किनई, ये किनई डबा खायला.  नाहीतर किनई बेलच किनई होणारssss. असलं कायतरी मुली तिला बोलणार. पण 'किनई'  किनई कधीच रागावणार नाही. उलट दोन्ही हात तोंडावर ठेऊन खो-खो हसणार. मी मात्र तिला नेहमी प्रांजलीच म्हणतो. कारण नंबर एक-तिचं नाव खूपच छान आणि वेगळं असल्याचं पप्पांनी मला सांगितलंय आणि कारण नंबर दोन म्हणजे, तिच्याशी कधी पण  बोलायला जा ती नीट बोलणार आणि भरपूर बोलणार.
                                     आमच्या वर्गात एकूण तीन प्रकारच्या मुली आहेत. प्रकार नंबर एकच्या मुली एकदम भांडखोर आणि चिडक्या. खेळताना हज्जार वेळा चिडाचिडी करणार. पुन्हा नखं-बिखं मारायलाही अंगावर धावत येणार. प्रकार नंबर दोनच्या मुली म्हणजे एकदम शांत. कधीच कुण्णाशीच जास्त बोलणार नाहीत. मुलांशी तर नाहीच नाही. त्यांना कुणी काय बोललं किवा चिडवलं तर लगेच जाउन बाईंना नाव सांगणार. एक नंबर चोंबड्या! प्रकार नंबर तीनच्या मुली मात्र आमच्याशी नीट बोलणार, खेळणार, भांडणारसुद्धा! पण बाईंना उगीच नावं सांगणार नाहीत. गृहपाठाची वही, गोष्टीची पुस्तकं, बाटलीतलं पाणी, खोडरब्बर, शार्पनर काही पण मागा  लगेच देणार.
                                     प्रांजली या तिसऱ्या प्रकारातली होती.






                                                                                                      … उर्वरित गोष्ट पुढच्या भागात