शुक्रवार, ९ मे, २०१४

सुरुवात करण्या अगोदर थोडंसं

                                                           
   
                           दररोज सूर्य उगवत होता नि मावळत होता.दिवस येत होता नि जात होता. आपण उठत होतो नि झोपत होतो. झोपून  पुन्हा उठत होतो. सगळं कसं कुणीतरी ठरवून दिल्याप्रमाणेच चालत होतं. परत परत तेच तेच. आपलं म्हणजे त्या समुद्रातून येणाऱ्या लाटांसारखंच झालं होतं. रोज रोज एकाच किनाऱ्यावर.तेही एकापाठोपाठ. पी. टी. च्या पिरिएडला समोर बाई असताना नीटपैकी रांगेत मुलं वर्गाबाहेर पडतात ना तसंच अगदी.
                         ......................................................................................................................

                           फार फार वर्षांनी आता किनाऱ्यावरून त्या लाटा पाहताना जाणवलं , की प्रत्येक लाट जरी सारखीच भासत असली तरी त्या प्रत्येकीत काहीतरी वेगळं आहे. दिशा, गती आणि शेवट जरी सारखा असला तरी एक विलक्षण फरक त्या प्रत्येक लाटेमध्ये आहे.प्रत्येक पोरगा किंवा पोरगी एकाच रांगेत चालत वर्गाबाहेर पडत असले तरी मैदानावर पोहोचेपर्यंत प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं असणार आहे.


                           तेच "काहीतरी वेगळं " या सोनेरी लाटांच्या गोष्टींत असणार आहे.

३ टिप्पण्या: